पालिका पदाधिकाऱ्यांची अनास्था : ६० वर्षे जुन्या योजनेवरच पाणी पुरवठावणी : गेल्या अनेक वर्षांत नगरपालिकेत पदाधिकारी राहिलेल्या राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळेच वणीकर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झुंजावे लागत आहे. १९५६ साली कार्यान्वित झालेल्या जुन्या पाणी पुरवठा योजनेवरच नागरिकांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. ६० वर्षांपूर्वी वणी शहराची लोकसंख्या केवळ २५ हजारांच्या घरात होती. या लोकसंख्येच्या आधारावर तत्कालिन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु आज वणी शहराची लोकसंख्या अडीच पटीने वाढली आहे. पर्यायाने पाण्याचा वापर वाढला. मात्र आज अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येला पुरेशा पाण्याचा पुरवठा करणारी सशक्त योजना नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी मारामार सुरू आहे. या नळयोजनेची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली असून त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यापलिकडे पालिकेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. वणी नगरपालिकेकडून दरवर्षी नवरगाव धरणातील पाणी आरक्षित केले जाते. निर्गुडा नदीतील जलस्त्रोत आटल्यानंतर नवरगाव धरणातील पाणी घेतले जाते. त्यातून शहराला पाणी पुरवठा होतो. २००४ मध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. तत्कालिन नगराध्यक्षा शालिनी रासेकर यांच्या कार्यकाळात या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जवळपास ५० लाख रुपये खर्च करून राजूर पिठवरून पाईप लाईन टाकण्यात आली होती. मात्र तीदेखील अपयशी ठरली. कॉंग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार व शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात वणी शहरासाठी नवी नळयोजना कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न केलेत. मात्र राजकीय हेव्यादाव्यातून नगरपालिकेच्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी या लोकप्रतिनिधींना प्रतिसादच दिला नाही. विशेष म्हणजे वर्धा नदीच्या पाण्यावर नळयोजना तयार करण्यासाठी त्यावेळी नगरपालिकेने ठरावही घेतला. मात्र ज्या ताकदीने या विषयाचा पाठपुरावा व्हायला हवा होता, तो करण्यातच न आल्याने नागरिकांना दरवर्षीच नागरिकांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो (कार्यालय प्रतिनिधी)
वणीची नळयोजना झाली अशक्त
By admin | Updated: June 24, 2016 02:48 IST