६१ लाखांचा हप्ता : सात हजार शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शासनाने हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर केली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना पैशाची तजवीजच करता आली नाही. केवळ सात हजार शेतकरीच या योजनेत सहभागी झाले. यामुळे हवामानावर आधारित विमा हवेतच विरल्याचे दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा आणि राष्ट्रीय पीक विमा योजना जाहीर करण्यात आली. दोनही विमा योजनेची मुदत संपली आहे. हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा अंतिम अहवाल आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे. हवामानावर आधारित योजनेत जिल्ह्यातील केवळ ७ हजार ४९ शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला. या शेतकऱ्यांनी ६ हजार ५६९ हेक्टरवरील पीक संरक्षित केले. त्यासाठी ६१ लाख ९९ हजारांचा हप्ताही भरला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो शेतकरी हवामानावर आधारित पीक विम्याचा लाभ घेऊ शकले नाही. (शहर वार्ताहर) राष्ट्रीय पीक विम्यासाठी अफलातून अट राष्ट्रीय पीक विमा योजना काढण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली. शेकडो शेतकरी अद्यापही विमा काढण्यापासून वंचित आहे. अशा स्थितीत पीक विमा योजनेला मुदतवाढीची मागणी पुढे आली. त्यानंतर राज्य शासनाचे अवर सचिव श.बा. पावस्कर यांनी मुदत वाढीचा आदेश काढला. यासाठी अफलातून अट टाकण्यात आली. १ आॅगस्टनंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आता राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. यातून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.
हवामानावर आधारित विमा हवेतच
By admin | Updated: August 3, 2015 02:15 IST