यवतमाळ : मराठवाड्यात वेअर हाऊस पद्धती बऱ्यापैकी रुजत आहे. विदर्भातही खासगी वेअरहाऊस पद्धती रुजणे आवश्यक आहे. याठिकाणी शेतकऱ्यांना आपला माल साठवता येईल आणि भाव वाढल्यावर आपला माल विकता येईल, असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्र परिषदेत केले. नगरपंचायतीच्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी पाशा पटेल आले असता पत्रकारांसोबत बोलत होते. यावर्षी सोयाबीनचा प्रचंड तुटवडा असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख पाच हेक्टर क्षेत्रात खरिपाची सोयाबीनची पेरणी झाली आहे. देशात सर्वाधित सोयाबीनचे उत्पादन होणारे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश हे राज्य असून, यावर्षी महाराष्ट्रात ३७ लाख हेक्टरवर तर मध्यप्रदेशात ५९ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. परंतु प्रत्यक्षात २३ लाख मेट्रिक टन महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन होईल. ३० ते ४० टक्के उत्पादन सर्वत्र घटले आहे. देशातही १०० ते ११० लाख मेट्रीक टन सोयाबीनच्या उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु आता ते ६१ ते ६२ लाख मेट्रिक टन वर आले आहे. सोयाबिनचा प्रचंड तुटवडा आहे. शेतकऱ्यांनी पाच ते सहा महिने तग धरल्यास सहा हजार रुपये प्रती क्विंटल सोयाबीनला भाव मिळू शकतो. कमी उत्पादनात जास्त भाव यावर्षी मिळू शकण्याची शकतो, असे पाशा पटेल म्हणाले. महाराष्ट्र शासनाने कडधान्य व तेलबियांना साठवणुकीसाठी निर्बंध घालण्याची अधिसूचना जारी केली आहे. परिपत्रकात कडधान्य व तेलबिया असा शब्द प्रयोग असल्यामुळे याचा फटका सोयाबीन व इतर तेल उद्योगास बसत आहे. गेल्या तीन-चार दिवसात सोयाबीनचे भाव ४०० रुपयांनी कमी झाल्याची कबुली त्यांनी दिली. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचेही पाशा पटेल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
वेअरहाऊस पद्धती विकसित होणे गरजेचे
By admin | Updated: October 26, 2015 02:29 IST