जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ५० गावांचा पाणीप्रश्न सुटणारउमरखेड : तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. त्याची दखल घेत उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी पाठपुरावा केला. अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी पैनगंगा नदीपात्रात नांदेडसाठी सात टीएमसी आणि उमरखेडसाठी पाच टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे नदीकाठावरील ५५ गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे. यावर्षी पैनगंगा नदीपात्रातील पाणी पूर्णपणे आटल्याने नदी कोरडी पडली. त्यामुळे नदीकाठच्या ५५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये तिवरंग, मालखेड, झाडगाव, हातला, दिवट, पिंपरी, पळशी, नागापूर, बारा, बेलखेड, चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, राजापूर, चालगणी, साखरा, खरूस, दिघडी, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोप्रा, मानकेश्वर, सिंदगी, सावळेश्वर, सोईट, पिंपळगाव, मुरली, परोटी, थेरडी, सोनदाबी, सहस्त्रकुंड अशा ५५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. परंतु त्याची कुणीही दखल घेतली नाही. काही दिवसांपूर्वीच यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईसंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये उमरखेड तालुक्यातील भीषण पाणीटंचाईवर आमदार राजेंद्र नजरधने यांनी पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला दिला. याचा परिणाम म्हणून इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. १२ टीएमसी पाणी नांदेड व उमरखेडला विभागून देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग नांदेडचे अभियंता यांना या बाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील नदीकाठच्या शेवटच्या गावापर्यंत नदीचे पाणी पोहोचणार असून त्यामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ५५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. शासनाच्या या निर्णयामुळे या ५५ गावांमधील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)
अखेर इसापूर धरणातून सोडणार पैनगंगेत पाणी
By admin | Updated: April 14, 2016 02:06 IST