वणी : येथील रंगनाथ स्वामी यात्रेचा शुभारंभ होऊन १५ दिवस लोटले आहे. मात्र अद्याप यात्रेला मूर्तरूप आलेले दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस यात्रेवर अवकळा येत असल्याचा अनुभव वणीकरांना येत आहे.येथील रंगनाथस्वामी यात्रेला १६० वर्षांची परंपरा लाभली आहे. तब्बल ३७ दिवसांची भरणारी ही यात्रा एकेकाळी विदर्भात प्रसिद्ध होती. यात्रेनिमित्त भरणारा बैलबाजार तर मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथील बैलांच्या व्यापाऱ्यांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. दरवर्षी धुलीवंदनापासून यात्रेला सुरूवात होत होती. गुढीपाडव्याला शेतकरी गडी, माणसे नियुक्त करण्यासाठी आपापल्या गावी परतायचे व पुन्हा गुढीपाडव्यानंतर यात्रा बहरली जायची. त्याकाळी यात्रेत येणारे ‘तमाशे‘ यात्रेचे मुख्य आकर्षण असायचे. नाट्यमंडळे, सर्कस, वेगवेगळी करमणुकीची साधने यांची रेलचेल असायची. मात्र जेव्हापासून यात्रेत तमाशांना बंदी घालण्यात आली, तेव्हापासून यात्रेची घसरण सुरू झाली. आता विस्तीर्ण यात्रा मैदान अतिक्रमणाने वेढले गेले. बैल बाजारही विरळ होऊ लागला. यावर्षी यात्रेची सुरूवात होऊन १५ दिवस लोटले आहे. मात्र अजूनही यात्रेला मूर्तरूप आले नाही. आता कोठे आकाश पाळणे उभारणीचे काम सुरू आहे. नगरपरिषद प्रशासनसुद्धा गावाच्या यात्रेकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून पाहात आहे. त्यामुळे यात्रा लिलाव करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यात्रेमध्ये रंगत आणण्यासाठी कोणाकडूनही प्रयत्न होताना दिसत नाही. यात्रेला मिनीबाजाराचे रूप आले आहे. बैल बाजाराला आठवडी बाजाराचे रूप आले आहे. शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट असल्याने बैलांची खरेदी करणारे कास्तकारही बोटावर मोजण्याइतकेच आहे. वैरण टंचाई व कुटुंबाचा गाडा हाकण्याची पंचाईत शेतकऱ्यांवर आल्याने बरेचसे शेतकरी बैलजोडी विकण्यासाठीच आले आहेत. खरेदीदारच नसल्याने बैलांचा बाजार मंदावला आहे. यात्रेमध्ये फेरफटका मारणाऱ्यांचे पायही अजून यात्रेकडे वळताना दिसत नाही. यात्रेत बैलांचा साज, शेतीपयोगी वस्तुंची दुकाने लागली. मात्र या दुकानांतही शेतकरी गर्दी करताना दिसत नाही. यात्रेचा लिलाव १२ लाख रूपयांच्यावर गेल्याने यात्रेत उतरलेली दुकाने, करमणुकीची साधने यांचे दरही गोरगरिबांना परवडणारे राहणार नाही. त्यामुळे यात्रेतील सर्वसामान्यांचा प्रवेश केवळ दुरूनच मौजमजा पाहण्याएवढाच सिमीत राहण्याची शक्यता आहे. यावर्षी अद्याप यात्राच बहरली नसल्याने श्री.रंगनाथ स्वामी मंदिरावरही झगमगाट दिसून येत नाही. यात्रेकरूंसाठी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचीही मेजवानी केलेली नाही. एककूणच यावर्षीची यात्रा भरणार केव्हा व संपणार केव्हा, हेसुद्धा कित्येकांना कळणार नाही, अशी सध्याची परिस्थिती दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वणीच्या प्रसिद्ध रंगनाथ स्वामी यात्रेवर अवकळा
By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST