वीज गुल : तीन तास बरसल्या रोहिणी, शेतकऱ्यांची धावपळ सुरू, आता सर्व लक्ष लागले मृगधारांकडे वणी : वणीसह मारेगाव तालुक्याला मंगळवारी रात्री वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सुमारे तीन तास रोहिणी बरसल्या. पहिल्याच पावसाने वातावरणातील सर्व उकाडा नाहिसा केला. शेतकऱ्यांनीही आता पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ केला आहे.गेल्या २५ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरूवात झाली. त्यानंतर २६ मे रोजी पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पारा भडकला होता. गेले पाच दिवस वातावरणात भयंकर उकाडा जाणवत होता. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर मंगळवारी सकाळापासून उन्ह तापले होते. या उन्हामुळे सर्वच घायाकुतीस आले होते. मात्र सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ७ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. पावसाला एकदा सुरूवात झाल्यानंतर तब्बल तीन तास पाऊस कोसळत होता. यावेळी वादळी वाराही सुटला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीजही गुल झाली होती. मात्र काही वेळानंतर ती परतली. तथापि पाऊस रात्री १0 वाजतापर्यंत सुरूच होता. त्यानंतर पुन्हा वीज गुल झाली. येथील २२0 के.व्ही.उपकेंद्रात बिघाड झाल्याने शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. अखेर महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नाने रात्री १२ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश प्राप्त केले. वादळासह पाऊस कोसळत असताना विजांचा प्रचंड कडकडाट सुरूच होता. विजांच्या कडकडाटाने नागरिक भयभीत झाले होते. क्षणार्धात वीज चमकून मोठा कडकडाट कानी ऐकू येत होता. लालगुडा परिशरहतील एका झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला होता. यावेळी रात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने बालक तर अत्यंत भयभीत झाले होते. या वादळी पावसाचा तडाखा वणी तालुक्यात सर्वदूर बसला. शिरपूर, शिंदोला, पुनवट, नांदेपेरा, राजूर कॉलरी, घोन्सा, चिखलगाव आदी सर्वच ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला. या वादळी वाऱ्यामुळे वणी ते घोन्सा मार्गावरील मोहोर्लीजवळ एक झाड उन्मळून रस्त्यावर आडवे पडले होते. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक प्रभावीत झाली. या मार्गाने दुचाकीने प्रवास करणाऱ्या काही युवकांनीच ते झाड मोहोर्ली गावातील युवकांच्या सहाय्याने बाजूला केले. तोपर्यंत वणी ते घोन्सा-झरी मार्गावरील एस.टी. बसही पलीकडेच थांबून होती. नंतर मात्र या मार्गावरील वाहतूक मध्यरात्री १२ वाजतानंतर सुरळीत सुरू झाली. पहिल्याच पावसाने जोरदार दणका दिल्याने दोनही तालुक्यातील नागरिक चांगलेच घाबरले होते. पाऊस थांबल्यानंतरच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. (कार्यालय प्रतिनिधी)
वणी, मारेगावला वादळी पावसाचा तडाखा
By admin | Updated: June 4, 2015 02:12 IST