मशागत पूर्ण : बी-बियाणे, खतांसाठी धडपड, पुसद येथे कृषी केंद्रांमध्ये गर्दी पुसद : रोहिणी नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्यानंतर आता ८ जूनपासून सुरू होणाऱ्या मृग नक्षत्राची शेतकऱ्यांंना मोठी आशा आहे. मृगनक्षत्राच्या पावसावरच वर्षानुवर्ष पेरणी केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केले असून बी-बियाणे व खतासाठी धडपड सुरू आहे. केरळपर्यंत मान्सून धडकल्याचे वृत्त समजताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी मशागतीवर शेवटचा हात मारण्यात मग्न आहे. आता केवळ मृगनक्षत्राच्या पावसाची प्रतीक्षा आहे. रखरखत्यात उन्हात शेतातील कामे उरकली आहे. काही शेतात वखरणीचे कामे सुरू आहे. कचरा काडी, फणकट वेचणे, धुऱ्यावरील बांधबंदीस्त करणे आदी कामे सध्या सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली. मोठ्ठाली ढेकळ बाहेर आली. परंतु पाऊसच झाला नसल्याने हे ढेकळे विरगळली नाही. आता ट्रॅक्टरद्वारेच ढेकळे फोडून जमीन भुसभुसीत करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला नाही. उन्हाचा तापही कमी झाला नाही. रोहिणी नक्षत्रात दरवर्षी ढगाळी वातावरण राहत असल्याने उकाडा कमी होते. परंतु यावर्षी तसे झाले नाही. पेरणीसाठी मृगाचा पाऊस महत्वाचा असतो. मृगधारा बरसल्यानंतर शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न फुलणार आहे. यासाठी मृगाच्या पावसाकडे डोळे लावून बसला आहे. रोहिणी नक्षत्र २५ मेपासून सुरू झाले असून त्याचे वाहन उंदीर आहे. त्यामुळे आकाश आभ्राच्छादित दिसत आहे. मृग नक्षत्र ८ जूनपासून सुरू होणार आहे. त्याचे वाहन कोल्हा आहे. या नक्षत्रात काही प्रमाणात पाऊस असणार आहे. परंतु अर्धपर्व मान्सूनचे वारे सुरू झाले नाही. रोहिणी नक्षत्राच्या शेवटीशेवटी ४ जूनच्या रात्री तुरळक पाऊस कोसळला. आद्रानक्षत्र २२ जूनला सुरू होणार आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. पुनर्वसू नक्षत्र ६ जुलैला प्रारंभ होणार आहे. त्याचे वाहन हत्ती आहे. या नक्षत्रात दमदार पाऊस राहणार असे जाणकार सांगतात. पुष्पनक्षत्र २० जुलैला सुरू होणार आहे. त्याचे वाहन मेंढा आहे. या नक्षत्रात पाऊस राहणार आहे. आश्लेषा नक्षत्र ३ आॅगस्टला लागत असून त्याचे वाहन गाढव आहे. मघा नक्षत्र १७ आॅगस्टपासून सुरू होत असून त्याचे वाहन बेंडूक आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र ३१ आॅगस्टला आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. उन्हाळाभर घाम गाळून काळ्या मातीची सेवा करण्यासाठी बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने सज्ज झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)बोगसचा धोकागेली दोन वर्षांपासून सोयाबीनचे उत्पादन अतिशय कमी होत आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनचे बोगस बियाणे येण्याची शक्यता आहे. गतवर्षी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे, असे आवाहन केले जात आहे. या बियाण्यांपासून उत्पादनही चांगले येते.
प्रतीक्षा मृगधारा बरसण्याची
By admin | Updated: June 7, 2015 00:00 IST