सदस्यांची तक्रार : शासकीय योजनांचा निधी हडपलायवतमाळ : शहरा लगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसचिवाने संगनमाताने ४० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनीच केली होती. या तक्रारीची सखोल चौकशी करून लाखोंच्या अपहारावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याच प्रकाराचा हिशेब आढळून आला नाही. दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत केलेली कामे ग्रामसभेतून न निवडता करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दलितवस्ती सुधारयोजनेतील कामांची मोजमाप पुस्तिका आणि कामाचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीमध्ये नसल्याने यात अपहार झाल्याचे दिसून येते. रोजगार हमी योजनेतून मंजूर रोपवाटिका, रस्ता खडीकर या कामावर पंचायत समिती स्तरावरिल संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन न घेता परस्पर ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. याबाबतचे कोणतेच दस्तऐवज उपलब्ध झाले नाही. २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात तीन लाख ८० हजार रुपयांचा मुरूम न टाकताच खोटे बिल काढले आहे. निविदा न बोलाविता इलेक्ट्रीक साहित्याची खरेदी केली. स्टेशनरी, कार्यालयीन खर्च, डिझल, ट्रॅक्टर दुरूस्ती, रोजनदारी मजूर कामावर नसतांना कामावर दाखविले, मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेत मंजूर प्राकलनानुसार काम न करता दुसरीच कामे केली. सार्वजनिक शौचालयाकरिता गावातील नागरिकांकडून लोकवर्गणी गोळा करून २० टक्के रक्कम भरण्यात आली. याबाबतचे कोणतेच दस्तऐवज ग्रामपंचायतीमध्ये आढळून आले नाही. ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार हा घरून सुरू असल्याचे सिध्द झाले आहे. दोन्ही चौकशी अधिकाऱ्यांनी प्राथमिकस्तरावर येथील ग्रामसेवक जगताप यांना दोषी ठरविले आहे. यात सरपंचाचा कितपत सहभाग आहे. याचीही चौकशी केली जाणार आहे.आर्थिक अफरातफर असल्याची तक्रार आठ ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. याची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी व्ही.एल. खेडकर आणि विस्तार अधिकारी आर. आर. खरोडे यांची समिती नेमण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली. यात धक्कादाय प्रकार उघडीस आला आहे. तक्रार कर्त्यां ग्रामपंचायत सदस्यांनी केलेले जवळपास सर्वच आरोप सिध्द झाले आहेत. शासकीय योजनांसह इतरही निधीत अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वाघापूर ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार असून येथील कामाकाजाचा बोजवारा उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोेणतीच सुविधा मिळत नाही. आता या दोषी ग्रामसेवक आणि सरपंचावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विक्की राऊत, प्रफुल गुजलवार, राजेंद्र तलवारे, राजू चांदेकर, जितेंद्र धानके, नितीन मिर्झापुरे, दिलीप मडावी, शिला इंगोले यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
वाघापूर ग्रामपंचायतीच्या ४० लाखांच्या अपहारावर शिक्कामोर्तब
By admin | Updated: July 28, 2014 23:45 IST