अशोक काकडे - पुसद विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी सुरू असून या तस्करीमागे तेलंगणातील सागवान तस्करांचा सहभाग असल्याचे वारंवार उघड झाले आहे. वन विभागाच्या हाती एक टोळी लागली. तेव्हा तेलंगणात सागवान तस्करांचे गावच असल्याचे पुढे आले. निजामाबाद जिल्ह्यातील केशवपट्टणम असे या गावाचे नाव असून तेथे १० ते १२ टोळ्या कायमस्वरूपी कार्यरत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वन विभागात गेल्या काही वर्षांपासून सागवान तस्करीच्या मोठ्या कारवाया होत आहे. वाहनाद्वारे सागवानाची तस्करी केली जात आहे. या टोळ्यांना स्थानिक चोरट्यांचे सहकार्य असल्याने त्यांचे काम बिनबोभाटपणे होत आहे. नुकतीच एक टोळी वन विभागाच्या हाती लागली असून या टोळीमुळे सागवान तस्करीचे मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात होणाऱ्या सागवान तस्करीमागे तेलंगणातील टोळीचा हात असल्याचा संशय नेहमी व्यक्त केला जात होता. मात्र दोन दिवसापूर्वी सापडलेल्या टोळीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. वन अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. तेलंगणातील निजामाबादजवळील केशवपट्टणम असे सागवान तस्करांच्या गावाचे नाव आहे. या ठिकाणी दहा ते बारा टोळ्या कार्यरत असून त्यातील पाच टोळ्या महाराष्ट्रातून सागवानाची तस्करी करतात. तेलंगणातील सागवान तस्कर इतके सराईत आहे की, काही वेळातच ते सागवानाचे मोठे वृक्ष कापून वाहनाद्वारे नेतात. यांची चोरी करण्याची पद्धतही अजब आहे. वाहन घेऊन ते मराठवाडा मार्गे विदर्भाच्या जंगलात शिरतात. वाहन जंगलापासून दूर कुठे तरी धाब्यावर थांबविले जाते. अनेकदा तर वाहन पंक्चर असल्याचा देखावा निर्माण केला जातो. दोन-तीन तासात पद्धतशीरपणे सागवान कटाई केली जाते. दोन दुचाकीधारक अवतीभोवती निगराणी करीत असतात. जंगलात स्थानिक मजूर सागवान तोड करतात. परंतु याचा वन विभागाला थांगपत्ता लागत नाही. एकदा सागवान तोडले की काही वेळात वाहन जंगलाशेजारी आणून त्यात सागवान भरले जाते. त्यावर ताडपत्री टाकून कुटाराचे पोते ठेवले जातात. एकदा महाराष्ट्राची हद्दपार केली की तेलंगणात त्यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे या टोळ्यांचा शिरकाव महाराष्ट्रात वाढला आहे. या टोळ्यांमुळे विदर्भातील मौल्यवान सागवान मात्र नष्ट होत आहे.
तेलंगणात सागवान तस्करांचे गाव
By admin | Updated: September 29, 2014 23:13 IST