पुसद : समाजाच्या विकासाची प्रक्रिया सुरू असताना येथील व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायतीचा आधार घेतला जात होता. पंचायतीचे निर्णय एकदिलाने मान्य केले जात होते. या पंचायतीचे आजच्या आधुनिक युगात बदलले स्वरूप म्हणजे तंटामुक्त समिती होय. आज तंटामुक्त समिती ही कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. पूर्वी राजे-महाराजांच्या काळात गावपातळीवर न्यायनिवाडाकरिता पंचायत ही सर्व अधिकार असलेली महत्वाची व्यवस्था होती. पंचायतीमध्ये गावात उद्भवलेला कोणताही वाद सामंजस्यानेच सोडविला जात होता. आजही देशातील काही राज्यांमध्ये गाव पातळीवरील निवाडे पंचायतीत निकाली काढले जातात. महाराष्ट्रात १९८0 च्या दशकामध्ये लोकन्यायालयाची स्थापना करण्यात आली. तालुका व गाव पातळीवर लोक न्यायालय भरवून जलद गतीने खटले निकाली काढण्याचे काम झाले. तरीही प्रलंबित राहणार्या प्रकरणांमध्ये फारसा फरक पडला नाही. यावर प्रभावी उपाय म्हणून गावातील तंटे सोडविण्याकरिता नवीन काही तरी माध्यम असावे, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती ही नवीन योजना समोर आणली. या योजनेमुळे न्याय व्यवस्थेवर पडणारा भार व पोलीस प्रशासनावर येणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न झाला. महत्वाकांक्षी कल्पना जनतेसमोर ठेवताना ही योजना यशस्वी होईल, की नाही हा प्रश्न होता. कोणतेही कार्य केल्याशिवाय त्याचे चांगले व वाईट परिणाम लक्षात येत नाही, हे विशेष. राज्यात महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीची स्थापना १५ ऑगस्ट २00७ रोजी करण्यात आली. छोट्या छोट्या कारणांवरून ग्रामीण भागात तंट्याची सुरुवात होते. दोन परिवारातील वाद सार्वजनिक स्वरूप धारण करतात. या तंट्याचे रुपांतर मोठय़ा भांडणात होते. तसेच काही ठिकाणी तर जातीय तणावाला तोंड फुटते. या पद्धतीनेच कुटुंबासोबत समाजाची शांतता संपुष्टात येते. परस्पराविषयी अविश्वाचे वातावरण निर्माण होऊन विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसतो. राज्यात अनेक धर्म, पंथ, १८ पगड जाती, उपजातीचे लोक असताना येथील परंपरा, चालिरीती, सण, उत्सव, वेशभूषा व आचारविचार वेगवेगळ्या आहेत. राज्यात दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांचे प्रमाण वाढत असताना केवळ तंटामुक्तीमुळे यातील अनेक प्रकरणे स्थानिक पातळीवरच निकाली काढण्यात यश मिळाले आहे. न्यायालयाचा दिवसेंदिवस वाढत असलेला भार कमी करण्याच्या हेतूनेच तंटामुक्त समिती कार्यरत आहे.प्रोत्साहनासाठी रोख पारितोषीक देण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
गाव पंचायती म्हणजे तंटामुक्त समिती
By admin | Updated: May 25, 2014 23:55 IST