तीन महिन्यांपासून बांधकाम : कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्नसुनील हिरास दिग्रसरस्ते, नाली बांधकामात गैरप्रकार नित्याचीच बाब झाली. तक्रार आल्यावरही प्रशासन निगरगट्ट असते. रस्त्यालगत महिनोंमहिने चालणारे बांधकाम, त्याचा कुणाला त्रास होत असेल याचीही पर्वा नसते. मात्र अशाच बांधकामाचा एक तरुण बळी ठरला. त्याचा अख्खा परिवार उघड्यावर आला. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे हरसूलच्या शेख मुसाचा बळी गेला. त्याच्या मृत्यूनंतरही बांधकाम विभाग धडा घेईल, असे वाटत नाही. केवळ फलक लावून काम भागत नाही तर नियोजित वेळेत सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची काम करण्याची गरज असते, हे या घटनेने दाखवून दिले आहे.दिग्रस शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या कामाचा सर्वांना अनुभव आहे. रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य, उघडे गज कायम असतात. यानंतरही या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. नालीचे खोदकाम शहरात करताना वाहनधारकांसह त्या परिसरात राहणाऱ्यांना काय त्रास होत असेल, हे त्यांनाच माहीत. दिग्रस येथील नालीचे बांधकाम गत तीन महिन्यांपासून सुरू होते. या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. वारंवार तक्रारी करूनही बांधकामाने वेग घेतला नाही. अर्धवट नालीच्या बांधकामाचे उभे गज मृत्यूला आमंत्रण देत आहे. विशेष म्हणजे नालीचे बांधकाम करताना या ठिकाणी कोणताही सूचना फलक लावला नव्हता किंवा अडथळाही निर्माण केला नव्हता. अशा या नालीजवळ तोल जावून हरवूलचा शेख इसा शेख मुसा कोसळला. नालीवरील उभा गज थेट त्याच्या गळ्यातून मेंदूपर्यंत शिरला. गज शिरताच तो तडफडू लागला. काही नागरिकांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याला उचलून धरले. तेव्हा त्याच्या गळ्यातील गज निघाला आणि रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. गंभीर अवस्थेत नागपूर येथे रवाना करण्यात आले. २४ तास मृत्यूशी झुंज देत मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. बांधकाम विभागाच्या या नालीचे एका पत्नीचा आधार गेला. पाच मुली आणि एका मुलाचा पिता गमावला. संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात झाला. कमावता व्यक्ती गेल्याने भविष्याची चिंता निर्माण झाली. बांधकाम विभागाला आधीच शहाणपणा सूचना असता तर शेख इसाचा बळी गेलाच नसता, अशी चर्चा आहे. मात्र शेख इसाच्या मृत्यूनंतर बांधकाम विभागाला जाग आली. त्याच्या मृत्यूची वार्ता दिग्रसमध्ये पसरताच सर्वप्रथम बांधकाम विभागाने त्या ठिकाणी जावून फलक लावला. नालीवर उभे असलेले गज वाकविण्यात येत आहे. शेख इसाच्या मृत्यूपूर्वीच हे शहाणपण सूचले असते तर त्याचा जीव गेला नसता, अशी चर्चा आहे. शेख इसाच्या मृत्यूनंतर संबंधित कंत्राटदार आणि शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल केल्याने शेख इसा परत येणार नाही. त्याच्या कुटुंबाला आता जगण्यासाठी आधार देण्याची गरज आहे. शहरात आजही अनेक ठिकाणी असेच धोकादायक पद्धतीने बांधकाम सुरू आहे. रस्त्यावर रेती, गिट्टी पडून आहे. अशा ठिकाणाहून जाताना दुचाकीधारक स्लिप होवून पडतात, किरकोळ जखमी होतात. शहरातील रस्त्यावरही मोठमोठाले खड्डे पडले आहे. परंतु हे खड्डे बुजविण्याची तसदी बांधकाम विभाग घेत नाही. अभियंता-कंत्राटदारावर जुजबी गुन्हेमानेत गज शिरल्याने गंभीर झाल्यानंतर शेख इसा नागपूरच्या रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होता. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता एम.एम. माथूरकर, कंत्राटदार प्रदीप कणिराम जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी जुजबी गुन्हे दाखल केले. आता शेख इसाचा मृत्यू झाला. त्याचा परिवार मृतदेहासह बांधकाम कार्यालयावर धडकले. परंतु त्यांची बोळवण करण्यात आली. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार, शाखा अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही शेख इसाच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. अन्यथा अशा घटना घडत जातील आणि शेकडो शेख इसा बांधकाम विभागाचे बळी ठरतील.
‘बांधकाम’च्या हलगर्जीने घेतला शेख इसाचा बळी
By admin | Updated: June 16, 2016 02:55 IST