हिवरी : यावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रापासून पावसाचा लहरीपणा कायम होता. पावसाने मध्यंतरी लांबलचक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लागवण केली. पावसाळ््याच्या अखेरीस का होईना, परंतु पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतात पिके दिसायला लागली. आता मात्र सोयाबीन पिकांवर उंट अळीने अक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी खचला आहे. हिवरी परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. सध्या सोयाबीनवर उंट अळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव पाहता ८० टक्के सोयाबीन पिके धोक्यात आली आहे. खरीपाचा हंगाम सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला. सोयाबीनची पेरणी ९० टक्के शेतकऱ्यांना दोन ते तीन टप्प्यात करावी लागली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील पेरणीतील पिके समाधानकारक आहेत. परंतु तब्बल एक महिन्यानंतर दुबार व तिबार पेरणी झालेले सोयाबीन पीक सध्या फुलांच्या अवस्थेत आहे. या पिकांवर हिरवळ व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाने वेळीच नियंत्रण मिळविणे गरजे आहे. या रोगांच्या किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यावर्षी जवळपास एक ते दीड महिने पावसाला उशिरा सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीही उशिराच केली. पेरणीनंतर पावसाने पुन्हा दडी मारली, यामुळे तालुक्यातील पिके कोमेजू लागली होती. आता रिमझीम पावसाने सोयाबीनच्या पिकांवर बुरशीजन्य रोगांची वाढ होत आहे. या रोगांमुळे सोयाबीन पीक पिवळे पडत आहे. त्यामुळे पिकांची वाढ ही खुंटली आहे. सोयाबीनला फुले कमी लागत आहेत. यामुळे उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खोड अळीमुळे झाडाचे आयुष्य कमी होत आहे. यावर शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाने या परिसरातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करने गरजेचे आहे. परंतु कृषी विभागाकडून परिसरातील कोणाच्याही सोयाबीन पिकांची पाहणी अद्याप झाली नाही. त्यामळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)
उंट अळीचे आक्रमण सोयाबीनची चाळणी
By admin | Updated: September 29, 2014 23:12 IST