सचिंद्रप्रताप सिंह : प्लास्टिक निर्मूलनासाठी सामाजिक संस्थांची बैठक, पदाधिकाऱ्यांनी सुचविले उपाययवतमाळ : कॅरीबॅग व प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. भविष्यात यामुळे अनेक वाईट प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हुन कॅरिबॅग तथा प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून कापडी, कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. जिल्ह्यातून कॅरिबॅग निर्मूलनासाठी सामाजिक संघटनांसोबत गार्डन हॉल येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, एसटीचे विभाग नियंत्रक एस.एस. जगताप, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे, जिल्हा प्रशासन अधिकारी एस.एस. धुपे यांच्यासह सामाजिक संघटनांचे दत्ता कुलकर्णी, अजय मुंधडा, राजु पडगीलवार, अशोक ठाकरे, प्रशांत दर्यापूरकर, प्रशांत बनगिनवार, जीवन कडू, डॉ. आलोक गुप्ता, डॉ. चेतन दरणे, देवेंद्र गुप्ता, मंगेश खुने, स्वप्नील बोमेनवार, सुबोध काळपांडे, प्रकाश धुमाळ, प्रा. घनश्याम दरणे, संजय चाफले, अश्विन सव्वालाखे, निखिल परोपटे आदी उपस्थित होते. प्लास्टिक निर्मूलनसाठी विविध सामाजिक संघटनांच्या संकल्पना आणि त्यासाठी प्रशासनाची लागणारी मदत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांची मते जाणून घेतली. काही संघटनांनी यासाठी निर्माण केलेल्या आराखड्यावर चर्चा केली. प्लास्टिक निर्मूललनासाठी कायद्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. परंतु यासाठी जनजागृतीही फार महत्वाची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिक निर्मूलनामुळे पर्यावरणाला हातभार लागण्यासोबतच प्रत्येकाने कापडी किंवा कागदी पिशवी वापरल्यास अशा पिशवी निमार्णातून अनेकांच्या हाताला रोजगार मिळणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. प्रत्येकाने घरून निघताना पिशवी सोबत घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
कॅरिबॅग टाळून कापडी पिशवीचा वापर करा
By admin | Updated: July 22, 2015 00:13 IST