पांढरकवडा : येथील विश्रामगृहात सोमवारी दुपारी ४ वाजता केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत कृषी विभागावर नाराजी व्यक्त करीत जतनेच्या पैशाची उधळपट्टी न करण्याचे निर्देश अहीर यांनी कृषी विभागाला दिले. येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाला दोन कोटींचा निधी प्राप्त झाला होता. तो निधी जुन्याच कामावर खर्च करून शेतकऱ्यांच्या फायद्याची कुठलीही नवीन कामे कृषी विभागाने केली नाही. त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी झाली असल्याचे आढावा बैठकीत अहीर यांच्या लक्षात आहे. त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी सातपुते यांना धारेवर धरत यापुढील कामे नियोजनबद्ध पद्धतीने करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी न करण्याचे व सर्व कामे शेतकऱ्यांच्या लाभाची, त्यांना लाभ होऊ शकेल, असे काम करण्याचे निर्देश दिले.कृषी विभागाच्या सर्व कामांवर उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी नियंत्रण ठेवण्याचे आदेशही अहीर यांनी दिले. यावेळी आमदार प्रा.राजू तोडसाम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे, संतोष चिंतावार, रमेश उग्गेवार, नगराध्यक्ष शंकर बडे उपस्थित होते. आढावा बैठकीत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याचे नागरिकांना आश्वासान दिले. त्यांनी जनधन योजनेच्या खातेदारांची, कृषी केंद्रांबद्दल माहिती त्यांनी घेतली. यावेळी व्यापारी संघटना, डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच कृषी केंद्र संघटनेने आपल्या समस्या मांडल्या. आढावा बैठकीला विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
केंद्रीय राज्यमंत्र्यांची कृषी विभागावर नाराजी
By admin | Updated: June 16, 2015 01:53 IST