कामासाठी भटकंती : वेकोलिचे दुर्लक्ष, कामाच्या शोधात युवकांचे मुंबई-पुण्याला स्थलांतरवणी : तालुक्यातील घोन्सा परिसरात खुली कोळसा खाण व कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण आहे. मात्र तरीही घोन्सा परिसरात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.घोन्सा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरच कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण सन २००० मध्ये सुरू करण्यात आली. ही कोळसा खाणी सुरू करताना वेकोलिने परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, गावातील विकास, रस्ते, वीज, प्रवासी निवारे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र खाण सुरू होऊन जवळपास १५ वर्षांचा कालावधी लोटूनही परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना वेकोलित कामच मिळाले नाही. त्यामुळे या दोन्ही खाणी केवळ नावालाच उरल्या आहे. त्यांचा स्थानिकांना कोणताही लाभ झालाच नाही. परिणामी परिसरातील ग्रामस्थांमध्ये वेकोलिविषयी संतापाची लाट उसळली आहे. घोन्सा येथेही खुली कोळसा खाण सुरू करण्यात आली. तेव्हासुद्धा या खाण प्रशासनाने परिसरातील ग्रामपंचायतींना पत्र पाठवून गावाचा विकास, बेरोजगारांना काम देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ग्रामपंचायतीने वेकोलिला खाण सुरू करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. मात्र प्रत्यक्षात खाण सुरू झाल्यानंतर वेकोलिची ही आश्वासने हवेतच विरली. त्यामुळे परिसरात आता सुशिक्षित बेराजगारांचा फौजफाटा निर्माण झाला आहे.या परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणारे भरपूर प्रशिक्षणार्थी आहे. मात्र या दोन्ही खाणीमध्ये त्यांना काम मिळत नसल्याने बाहेरगावी किंवा पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाऊन त्यांना काम शोधावे लागत आहे. तेथे तुटपुंज्या वेतनावर त्यांना काम करावे लागत आहे. ही समस्या कधी सुटेल, असा प्रश्न आहे.दिवसेंदिवस या परिसरात बेरोजगारांच्या संख्येत भर पडत आहे. दुसरीकडे वेकोलि नोकऱ्या देण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे युवकांमध्ये असंतोष उफाळून येत आहे. किमान स्थानिक युवकांना तरी वेकोलिने प्राधान्याने खाणींमध्ये नोकरी द्यावी, अशी परिसरातील बेरोजगारांची मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)मजुरांची संख्या फुगलीमजूर काम करणाऱ्या बेरोजगारांचीही संख्याही घोन्सा परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र वेकोलिकडून या मजुरांनाही काम मिळत नाही. त्यामुळे मजुरांना गावातीलच हंगामी कामावर समाधान मानावे लागत आहे. विशेष म्हणजे घोन्सा परिसरातील गावांचाही वेकोलितर्फे विकास करण्यात आला नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामपंचायती वेकोलिविरूद्ध रोष व्यक्त करीत आहे. गावामध्ये अनेक समस्या कायम असून याबाबत वेकोलिकडे निधीसाठी वारंवार संबंधित ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला. मात्र वेकोलितर्फे त्याची दखलच घेण्यात येत नाही. वेकोलिने आता आडमुठे धोरण सोडून घोन्सा परिसरातील बेरोजगारांना काम द्यावे, तसेच परिसरातील गावांचा विकास करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दोन खाणी असूनही बेरोजगारी कायम
By admin | Updated: June 21, 2015 00:09 IST