संजय भगत महागाव महागाव तालुक्याचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेणी येथे अधर पूस प्रकल्प उभारण्यात आला. मात्र या प्रकल्पातून अद्यापही पूर्ण क्षमतेने सिंचन झाले नाही. धरण परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य असते. सोई-सुविधांकडे दुर्लक्ष होत असून आजपर्यंत या प्रकल्पाला कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा हा प्रकल्प शासनाच्या लेखी दुर्लक्षितच दिसत आहे. महागाव तालुक्यातील वेणी येथे अधरपूस प्रकल्प आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता नऊ हजार हेक्टर आहे. गत पाच वर्षात धरणावर झालेला खर्च आणि तुलनेत शेतकऱ्यांना मिळालेले पाणी तसेच शासनाचा वसूल झालेला महसूल यांच्यात कुठेही ताळमेळ लागत नाही. या प्रकल्पाचा उपविभाग महागाव येथे आहे. प्रत्यक्षात या उपविभागाचे काम मात्र गंगाखेडवरूनच चालते. या प्रकल्पाचे उपअभियंता शेतकऱ्यांंना कधी दिसलेच नाही. त्यांनी स्वत:हून पाणी वाटप, कालव्याची दुरुस्ती, पाटचऱ्याची कामे आदीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही. शेतकऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचा संवाद नसल्याने धरणात पाणी असूनही दरवर्षी पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. महागाव तालुक्यातील सवना सर्कलमधील एकही कालवा दुरूस्त करण्यात आला नाही. मायनर ११-१२ सब १२, मायन १० वर कोणीतीच कामे झालेली नाही. धरणाच्या मुख्य कालव्यातून पाणी अधिक सोडले तर शेतकऱ्याला मिळत नाही. कारण कालवे नादुरूस्त आहे. पाणी कमी सोडले तर शेतकऱ्यांपर्यंत पोहाचत नाही. अशी दुहेरी अडचणीची स्थिती अधरपूस प्रकल्पाची झालेली आहे.
अधर पूस प्रकल्प दुर्लक्षित
By admin | Updated: June 10, 2015 02:40 IST