‘श्रावणबाळ’साठी बाँड : शिक्षित समाजातील मनसुन्न करणारी घटनायवतमाळ : शिक्षित समाजात मानवी संवेदना हरवत चालल्या आहेत. मुलांना आपले माता पिता जड वाटायला लागले आहेत. या मुलांनी आपल्या जन्मदात्यांना पोसण्यास असमर्थ असल्याचा बाँड शासनाकडे सादर केला आहे. या दुर्दैवी घटनेने मानव समाजाला विचार करण्यास भाग पाडले आहे. असे एक दोन नव्हेतर जिल्ह्यात ७० हजार आधुनिक श्रावणबाळ आहेत. सत्ययुगातील श्रावणबाळाने आपल्या माता पित्यांची इच्छा पूर्ण करता यावी म्हणून खांद्यावर कावड धरली. तिर्थयात्रा घडवून आणली. याच श्रावणबाळाप्रमाणे मुलांनी वृद्ध माता पितांच्या आयुष्याची काठी व्हावे म्हणून राज्य शासनाने श्रावणबाळ योजना सुरू केली. परंतु समाजात स्वार्थ इतका वाढला आहे, की धडधाकट मुलेही आपल्या माता पित्यांचा सांभाळ करायला तयार नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मुलांनी एकाकी सोडल्याने निराधार पालकांनी शासनाचे दार ठोठावले आहे. या मुलांनी आपल्या पालकांना पोसणे अशक्य असल्याचे लिहिले आहे. यामधून समाजाची ढासाळलेली नीतिमत्ता दिसून येते. मुलांना लहानाचे मोठे करण्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, त्याचे हेच फळ काय, असे म्हणण्याची वेळ या माता पित्यांवर आली आहे. आपले दु:ख कुणाला सांगावे आणि कुणापुढे रडावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. असे आहेत निराधार माता पिताजिल्ह्यात श्रावणबाळ योजनेमध्ये ७३ हजार ६२७ निराधार माता पित्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील ७० हजार माता पित्यांच्या मुलांनी आपण असमर्थ असल्याचे शपथपत्र शासन दरबारी सादर केले आहे. यवतमाळ तालुक्यात ५०४०, शहरी भागात २१६८ निराधार माता पिता आहेत. केवळ योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या माता-पित्यांना पोसण्यास असमर्थ असल्याचे लिहून देणारे आधुनिक श्रावणबाळ सध्या चर्चेचा विषय झाला आहे. (शहर वार्ताहर)
७० हजार मुले माता-पित्यांना पोसण्यास असमर्थ
By admin | Updated: February 22, 2016 02:40 IST