हिवरा संगम : जिवंत विद्युत तारांच्या घर्षणाने आग लागून दोन एकरातील उभा ऊस जळाला. यामुळे शेतकऱ्याचे किमान दोन लाखांचे नुकसान झाले. शेतकरी आपल्या शेतात वर्षभर राबराब राबून पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. मात्र, कधी अस्मानी संकट, तर कधी सुलतानी संकट ओढवते. तरीही पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड असते. काही अनपेक्षित संकटाने शेतकऱ्यांचे अनेक प्रकारे नुकसान होते. असाच प्रकार १७ सप्टेंबरला येथील महादजी धोंडीराव कदम यांच्या शेतातील लोंबकळलेल्या जिवंत विद्युत तारांच्या घर्षणाने आग लागून सुमारे दोन एकरमधील दोन लाख रुपयांचे ऊस पीक जळून खाक झाले.
याबाबत त्यांनी महागाव पोलीस ठाणे आणि महावितरणकडे तक्रार करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली. विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता मुडे, वरिष्ठ वीज तंत्रज्ञ रामेश्वर राऊत, वीज कर्मचारी रामहरी खंदारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. मागील वर्षीसुद्धा जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने कदम यांच्या दोन दुधाळ म्हशी गतप्राण होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, महावितरणकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही.