नगरपरिषदेचा पुढाकार : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रकल्पाला भेटदारव्हा : शहरात उद्भवलेल्या पाणीसमस्येवर तत्काळ तोडगा काढता यावा याकरिता नगरपरिषद व पाटबंधारे विभागाच्यावतीने संयुक्तरीत्या प्रयत्न करण्यात येत आहे. दोन्ही प्रकल्पाचे पाणी नदीत सोडून पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. दारव्हा शहरातील तीव्र पाणीटंचाईसंबंधितचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारला दारव्हा येथे दाखल होऊन नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रकल्पाला भेट देऊन योजनेची पाहणी केली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अडाण व कुपटी या दोन्ही नद्या आटल्यामुळे दारव्हा शहरावर तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नदीला पाणीच नसल्याने नगरपरिषदेच्या पेकर्डा व कुपटी या दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद पडल्या तर अरुणावती योजनेवरून पाणीपुरवठा सुरू असला तरी हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रावर पोहचून तेथील सम भरायला तीन दिवस लागतात व त्यानंतर येथून केवळ रेल्वे स्टेशन परिसर, बारभाई मोहल्ला, पुसद मोहल्ला, नवीन वसाहत या भागालाच पाणी दिल्या जाऊ शकते व त्यालाही ८ ते १० दिवस खंड पडतो. आणि कुपटी योजनेवरून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या भागाचा तर पाणी पुरवठा बंदच आहे. त्यामुळे शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचे आज ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रामटेके उपविभागीय अभियंता शेख यासह काही अधिकाऱ्यांनी दारव्हा येथे नगरपरिषद पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या नगराध्यक्ष अशोक चिरडे, मुख्याधिकारी अतुल पंत, ज्येष्ठ नगरसेवक हरीभाऊ गुल्हाने, मो. शोएब, पाणीपुरवठा विभागप्रमुख हिरासिंग राठोड आदींना अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. त्यामुळे लवकरच प्रकल्पातील पाणी नदीत सोडले जाण्याची शक्यता आहे. मात्र ते पाणी योजनेपर्यंत पाहोचायला विलंब लागणार असल्याने तत्काळ पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नगरपरिषदेने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
दारव्हाच्या पाणीटंचाईवर तोडगा काढण्याचे प्रयत्न
By admin | Updated: July 18, 2015 02:26 IST