कळंब : गर्भपात करताना युवतीचा मृत्यू आणि युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या येथील तुंडलवार डॉक्टर दाम्पत्याला अटकेसाठी आदिवासी संघटनांनी निवेदन दिले आहे. दुर्वेश बठे व रूपाली मेश्राम यांच्या मृत्यूस डॉ.तुंडलवार दाम्पत्य जबाबदार आहे. सदर युवती आदिवासी समाजाची असून आरोपी गैरआदिवासी समाजातील आहे. त्यामुळे सदर घटनेतील आरोपींवर अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करावा, आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी आदिवासी समाज बांधव तालुका शाखेच्यावतीने करण्यात आली. यासाठी तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाबाराव मडावी, प्रा.वसंत कन्नाके आदींची उपस्थिती होती.दरम्यान, शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ.आशा मिरगे यांनी ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे यांची भेट घेऊन सदर प्रकरणावर चर्चा केली. तपास कुठपर्यंत आला, तपासाची दिशा काय, आरोपींना अटक का झाली नाही आदी प्रश्न डॉ.मिरगे यांनी यावेळी उपस्थित केले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ.आशा मिरगे म्हणाल्या, हा विषय अतिशय गंभीर आहे. पुन्हा असा गुन्हा करु नये यासाठी आरोपींना कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. यावेळी बांधकाम सभापती आशिष धोबे, मनीषा काटे, प्रमोद उरकुडे, वादाफळे, अनिल कुबडे उपस्थित होते. घटनेपासून फरार असलेल्या डॉक्टर दाम्पत्याच्या शोधासाठी पोलीस विभागाची तीन पथके वेगवेगळ्या भागात गेली होती. मात्र या पथकांना आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. (तालुका प्रतिनिधी)
डॉक्टर दाम्पत्याला अटकेसाठी आदिवासी समाजाचे निवेदन
By admin | Updated: June 25, 2016 02:30 IST