यवतमाळ : वाघापूर ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शिवसेनेला गाठण्यासाठी काँग्रेस सोबतच सर्वच पक्षांनी आघाडी केली आहे. येथे शिवसेना आणि काँग्रेस सर्वाधिक सदस्य संख्या असलेले पक्ष राहीला आहे. आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख येथे असल्याने शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वाघापूर शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी काँग्रेस नेहमीच अग्रेसर राहिली आहे. येथील बरोबरीच्या सामन्यात नेहमीच भाजप अथवा अपक्षाने आपले हित साधून घेतले आहे. याही वेळेसची स्थिती अशीच आहे. केवळ वॉर्ड क्रमांक सहामध्ये बहुजनांच्या गठ्ठा मतावर अनेक समीकरण अवलंबून आहेत. येथे समता पॅनल आणि काँग्रेसचे वाघापूर परिवर्तन विकास आघाडी अशी लढत होत आहे. या वॉर्डात काँग्रेसची धुरा जितेंद्र ढाणके यांच्याकडे आहे. वॉर्ड क्रमांक चार आणि पाचमध्ये काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहेत. वॉर्ड क्रमांक एक आणि दोनमध्ये शिवसेना वरचढ ठरली आहे. शिवाय भाजपच्या एकमेव उमेदवाराने वॉर्ड पाचमध्ये स्वत:ची छाप सोडली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात लढत असलेल्या वाघापूर परिवर्तन विकास आघाडी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांचे जनसेवा पॅनल यात थेट लढत आहे. काँग्रेसकडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळसाहेब मांगुळकर यांनी व्यूहरचना केली आहे. यात कोण सरस ठरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. नुकतेच शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वाची जबाबदारी वाघापूरला मिळाली आहे. त्यामुळे येथील निवडणूक जिल्हास्तरावर महत्वाची ठरणार आहे. वाघापूर टेकडी आणि कोलाम पोड परिसरासह शिवाजी चौक हा भाग वॉर्ड क्रमांक चारमध्ये येतो. वॉर्ड दोनमध्ये सावित्रीबाई फुले सोसायटी परिसर, वॉर्ड क्रमांक एकमध्ये संभाजीनगर, पटवारी कॉलनी, रेणूका नगरी, भारतनगर हा परिसर आहे. वॉर्ड तीनमध्ये पंचशीलनगर, बनकर ले-आऊट, वॉर्ड पाचमध्ये बोरुंदीयानगर, सुवर्णनगर, चितळकर ले-आऊट परिसर, वॉर्ड सहा मध्ये माधवनगर, रंभाजीनगर हा परिसर येतो. वाघापूर मध्ये काही भागात अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहेत. सांडपाण्याच्या नाल्या, स्मशानभूमीचा प्रश्न येथे आहे. यासर्व समस्यांचा निपटारा कसा करणार याचे उत्तर मतदारांना द्यावे लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
वाघापूरमध्ये शिवसेनेला गाठण्यासाठी इतर एकत्र
By admin | Updated: July 22, 2015 00:22 IST