अनिष्ट प्रथा : तक्रार नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन यवतमाळ : वेठबिगार पध्दत (निर्मूलन) अधिनियमान्वये वेठबिगार पध्दतीवर बंदी आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या मालक व सावकारावर कार्यवाही केली जाते. जिल्ह्यात कुठेही वेठबिगार ठेवल्याचे आढळल्यास नागरिकांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.एखादी व्यक्ती वेठबिगार म्हणून काम करीत असल्याचे आढळल्यास संबंधितांनी त्याची तक्रार गावातील तलाठी, तालुकास्तरावर तहसीलदार, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच कामगार विभागातील अधिकाऱ्यांकडे नोंदवावी. याशिवाय जिल्हा व उपविभागीय स्तरावरील वेठबिगार दक्षता समितीकडेसुध्दा तक्रार नोंदविता येते. सरकारी कामगार अधिकारी रा.दे. गुल्हाने यांच्या ९८५०२९०३०५ या क्रमांकावरही माहिती देता येईल. सावकार किंवा मालकाकडून मुक्तता केलेल्या वेठबिगाराचे शासनाकडून रोजगार हमी योजना, आदिवासी विकास योजना, महात्मा फुले विकास महामंडळ, जंगल विकास महामंडळ यांच्यामार्फत मदत करून पुनर्वसन करण्यात येते. कामगारास काम मिळवून देण्यात येते. त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने शाळेत दाखल केले जाते. वेठबिगार ठेवणाऱ्या सावकार, मालकावर तीन वर्षापर्यंत तुरुंगवास व दोन हजार रुपयापर्यंत दंड अशी शिक्षा होते. वेठबिगार ही अनिष्ठ प्रथा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सावकार, मालक व जनतेने सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वेठबिगार दक्षता समितीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे. (वार्ताहर)बळजबरीने काम म्हणजे वेठबिगारीवेठबिगार म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या सावकाराकडून कर्ज घेवून त्या कर्जाच्या परतफेडीसाठी काम करणे किंवा कुटुंबातील व्यक्ती, वारस यांच्याकडून बळजबरीने काम करून घेणे होय. असे काम करून घेताना मजूरी न देणे आणि कामासाठी सक्ती करणे ही बाब वेठबिगारीत मोडते.
वेठबिगार ठेवल्यास तीन वर्षे तुरुंगवास
By admin | Updated: June 23, 2015 00:34 IST