यवतमाळ : शेतात तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेतील प्रवाह बंद करण्याची तक्रार देऊनही लाईनमनने कुचराई केली. त्यामुळे विजेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील दोषी लाईनमनला येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश डी.आय. शिरासाव यांनी तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. रमेश नथ्थुजी बांते असे शिक्षा झालेल्या लाईनमनचे नाव आहे. तर शेषराव आनंदराव ढेंगे रा. मांगलादेवी ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. २६ जून २०१३ रोजी सकाळी १० वाजता त्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला होता. शेषराव यांनी घटनेच्या आठ दिवसपूर्वीच मांगलादेवी येथील लाईनमन रमेश नथ्थुजी बांते यांच्याकडे अर्ज करून शेतातील तुटलेल्या तारांचा वीज प्रवाह बंद करण्याची विनंती केली होती. मात्र त्याची दखल घेतली नाही. घटनेच्या दिवशी शेषरावने वीज प्रवाह बंद केला काय, अशी विचारणा लाईनमन बांते यांच्याकडे केली. बांते याने वीज प्रवाह बंद असल्याचे सांगून तुटलेली तार एका ठिकाणी गोळा करून ठेवण्यास सांगितले. शेतात नांगरणी करायची असल्याने शेषराव आनंद ढेंगे यांनी तार उचलण्यासाठी हातात घेतली. त्यांना वीजेचा जोरदार धक्का बसून जागेवरच मृत्यू झाला. यावेळी शेषरावची पत्नी आणि शेतमजूर महिला घटनस्थळावर उपस्थित होत्या. या प्रकरणी दोषी लाईनमन विरोधात सुधीर शेषराव ढेंगे याने दिलेल्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. ठाणेदार डी.एस कडू यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. शिवाय वीज कंपनीच्या विद्युत निरीक्षकने दिलेल्या अहवालात सुध्दा लाईनमन रमेश बांते याच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला. या खटल्यात न्यायालयाने दाहा साक्षीदार तपासले. यामध्ये मृतकाची पत्नी, शेतातील मजूर यांची साक्ष महत्वाची ठरली. दोषी रमेश बांते याला तीन वर्ष कारावास आणि एक हजार दंडाची शिक्षा ठोठावली. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एन. जी. नथवाणी यांनी बाजू मांडली. (कार्यालय प्रतिनिधी)
शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणात लाईनमनला तीन वर्र्षांची शिक्षा
By admin | Updated: September 30, 2015 06:15 IST