पोलिसांच्या हातावर तुरी : १७ वर्षांपासून फरारीचा रेकॉर्ड सतीश येटरे - यवतमाळखून, दरोडे, प्राणघातक हल्ला, वाटमारी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील एक दोन नव्हे, तर तब्बल ३५२ आरोपी जिल्हाभरातून पसार आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देवून वर्षानूवर्षे हे आरोपी ओळख लपवून समाजात वास्तव्य करीत आहे. यातील काही आरोपींनी तर पसार राहण्याचा रेकॉर्डच केला आहे. एक आरोपी तब्बल १७ वर्षांपासून पसार असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे, हे विशेष! असे असले तरी पसार आरोपींचा फुगत चाललेला आकडा बघता पोलीस त्यांच्यापुढे दिवसेंदिवस हतबल होत चालल्याचे दिसून येत आहे. शरीर दुखापतीच्या आणि संपत्तीविषयक गुन्ह्यात जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्हे नोंद असलेले तब्बल ३५२ आरोपी पसार असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. त्यापैकी २६३ आरोपींची फरार, तर ८९ आरोपींची पाहिजेत या सदराखाली नोंद घेण्यात आली आहे. कुठलीही गुन्हेगारी घटना घडल्यानंतर पोलीस आरोपींना अटक करतात. त्यानंतर मात्र जामीन मिळताच हे आरोपी शिक्षेच्या भितीने पसार होतात. आरोपी अनुपस्थित असल्याने न्यायप्रविष्ट खटलेही प्रलंबित राहतात. अनेकदा समन्स बजावूनही आरोपी हजर होत नाही. वॉरंट निघाल्यानंतर पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेतात. मात्र शोध घेवून तो हाती लागत नाही. तेव्हा अनेकदा पोलिसांना न्यायालयाच्या संतापालाही सामोरे जावे लागते. दुसरीकडे एखाद्या गंभीर घटनेला मूर्तरूप देवून वर्षानूवर्षे पसार राहण्याचा ट्रेंड सध्या गुन्हेगारांमध्ये आहे. घटनेशी संबंधित पुरावे गोळा करून आणि तपास पूर्ण करून पोलिसांना ९० दिवसाच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावी लागते. तोवर आरोपीला अटक करण्यात अथवा पुरावे गोळा झाले नाही तर अनेकदा पोलीस न्यायालयाला विनंती करून अतिरिक्त अवधी मागते. परंतु वारंवार अवधी वाढवून मिळत नाही. ही पोलिसांची खरी अडचण असली तरी, गुन्हेगारांना मात्र ९० दिवसाच्या नंतर म्हणजेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयात आत्मसमर्पण केल्यास लवकर जामीन मिळतो. तसेच दोषारोपपत्रात तांत्रिक अडचणी राहून खटल्यातून निर्दाेष मुक्तता होते, असा गैरसमज गुन्हेगारांमध्ये आहे. त्यामुळे भितीतून नव्हे तर गैरसमजूतीतूनही अनेक आरोपी पसार आहेत. काही आरोपी हे सराईत असल्याने कारागृहात असताना इतर गुन्हेगारांशी झालेल्या ओळखीतून आणि त्यांच्याच आधाराने ते परजिल्ह्यात वास्तव्याला आहेत. पोलीस दफ्तरी पसार म्हणून नोंद असलेले अनेक आरोपी वर्षानूवर्षे पसार आहेत. त्यातील एक आरोपी तर तब्बल १७ वर्षांपासून फरार आहे. पसार आरोपी हे मूळगाव आणि ठिकाण सोडून समाजात वास्तव्याला आहेत. त्यासाठी ते आपली ओळख लपवतात. त्यामुळे पसार आरोपींचा आकडा वाढताच आहे. याउलट पोलिसांची यंत्रणा तोकडी आणि कुचकामी ठरत असल्यानेही काही आरोपी पसार असल्याचे सांगण्यात येते. काही आरोपी हे पोलिसांच्या हालचालींवर बारिक नजर ठेवत असल्याने ते हाती लागत नाहीत, हेसुद्धा या पसार आरोपींची जमेची बाजू आहे.
साडेतीनशेवर आरोपी विविध गुन्ह्यात पसार
By admin | Updated: September 17, 2014 00:01 IST