सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी : १५० व्या गांधी जयंती दिनी डॉक्टर, शिक्षक, संघटनेचे धरणेयवतमाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. शुक्रवारी त्यांची १५० वी जयंती देशभरात साजरी झाली. अहिंसेच्या सेवकांनी यवतमाळात शांततेचा मार्ग अवलंबित आंदोलन केले. यामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी न्यायासाठी बेमुदत आंदोलन केले. पतसंस्थेतील गैरप्रकाराच्या चौकशी करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यामध्ये शिक्षक सहभागी झाले होेते. सनातन या कट्टरतावादी संघटनेवर बंदी घालण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाजवळ धरणे देण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून यवतमाळकरांनी गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे बेमुदत उपोषणयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आंतरवासिता विद्यार्थिनीशी काही गुंडांनी गैरवर्तणूक करून मारहाण केली. यापूर्वी याच परिसरात १८ आॅगस्ट रोजी आंतरवासिता डॉक्टरवर गुंडांनी चाकूहल्ला केला. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. मात्र प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. यामुळे आंतरवासिता डॉक्टरांनी अधिष्ठाता हटावची मागणी केली. सुरक्षा व्यवस्थेसह इतर कारणांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.अस्मीच्या नेतृत्वात आंतरवासिता डॉक्टर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्यावर प्रचंड रोष व्यक्त केला. विद्यार्थिनीची छेडखाणी आणि विद्यार्थ्यांवर सतत हल्ले होत आहे. यानंतरही अधिष्ठातांनी याची कुठलीही गंभीर दखल घेतली नाही. त्यांनी सुरक्षेबाबत हात झटकले आहे. अधिष्ठातांच्या बेजबाबदारपणाने विद्यालयाच्या परिसरात गुंडांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या वेळी लाईट लावलेले नसातात. परिसरात मोठे झुडप आहे. याचाच फायदा गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती घेतात. संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला होतो. या ठिकाणची स्थिती सुधारण्यात यावी. अधिष्ठातांना हटविण्यात यावे. विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी थेट वैद्यकीय मंत्र्यांनी आश्वासन द्यावे. यानंतरच उपोषण मागे घेण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, डॉ. भूषण हाडोळे, डॉ. नेहा शेंडे, डॉ. विरेंद्र कदम, डॉ. रामदास मातने यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.सनातन संघटनेवर बंदीची मागणी यवतमाळ : सनातन संघटना सनातन प्रभातवर बंदी घालण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या नेतृत्वात बसस्थानक चौकात धरणे देण्यात आले.सनातन संघटनेचे मुख्य कार्यालय बांदोडा येथे आहे. हिंदू धर्माच्या नावाखाली ईश्वरी राष्ट्राच्या निर्मितीसाठी आम्ही कार्य करतो असे सांगतात. अध्यात्मताच्या नावाखाली दहशतवाद, आतंकवाद पसरविण्याचे कार्य ही संघटना करीत आहे. महागांव, वाशी, ठाणे, पनवेल, मालेगाव इत्यादी ठिकाणीसुध्दा बॉम्बस्फोट केल्याचा आरोप संघटनेवर आहे. यावेळी डॉ. दिलीप महाले, प्रवीण भोयर, योगेश धानोरकर, प्रकाश डब्बावार, शैलेश गाडेकर, नंदकिशोर ठाकरे, उमेश मेश्राम, नंदकिशोर ठाकरे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद पतसंस्थेविरोधात अन्नत्याग आंदोलन यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेत गत १५ वर्षापासून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करीत ठेवीदारांनी अन्नत्याग आंदोलन केले. चौकशीची मागणी लावून धरली. बुडीत संस्थेत ठेवी ठेवणे, स्वत:चे संस्थेत बेकायदेशीर गुंतवणूक करून कलम ७० चा भंग करणे, जिवंत सभासदाला मयत दाखवणे, नोकरी असून शेतकरी असल्याचे खोटे प्रतिज्ञालेख देणे, नियमबाह्य संचक अग्रीम मुदतीत न भरणे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुरूषोत्तम ठोकळ, निळकंठ कुळसंगे, प्रकाश हिवरे, विलास राठोड, महेश दत्तानी, शंकर आडे, देवा वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात तीन आंदोलने
By admin | Updated: October 3, 2015 02:26 IST