वीरूगिरी आंदोलन : प्रशासनानेही टेकले हातदिग्रस : तळपत्या उन्हात दिग्रस तहसीलच्या टॉवर गत तीन दिवसांपासून श्याम गायकवाड हा तरूण चढून बसला आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय खाली उतरायचे नाही, असा निर्धार श्यामने केला असून, त्याच्या विनवण्या करताना प्रशासनानेही हात टेकले आहे. ४२ अंश तापमानात श्यामला उन्हाचा तडाखा बसला आणि बरेवाईट झाले तर काय, यामुळे प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तालुक्यातील इसापूर येथील श्याम गायकवाड हा तरुण दिग्रसच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात टॉवर चढून जाण्यासाठी प्रसिद्धीस आला आहे. पोलीस ठाणे, पंचायत समिती येथील टॉवरवर चढून त्याने आतापर्यंत चारदा आंदोलन केले. मात्र हे सर्व आंदोलन हिवाळ््याच्या काळातील होते. परंतु यावेळी तळपत्या उन्हात श्यामने तहसील कार्यालयातील पवन उर्जेच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. वरून सूर्य आग ओकतोय, सवलीला केवळ त्याने सोबत नेलेले तीन झेंडे, पाण्याच्या बॉटल, बीस्कीट सोबत आहे. इसापूर येथील शासकीय जमिनीवरून जप्त केलेला आदिवासींचा लाकूडफाटा, टीनपत्रे त्यांना परत द्यावे, रुईच्या आदिवासींना हक्काचे घर द्यावे अशी मागणी तो करीत आहे. दरम्यान गुरूवारी तहसीलदार नितीन देवरे, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ठाणेदार आदींनी त्याला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका श्यामने घेतली आहे. रात्रभर तो टॉवरवरच बसून असतो. दिवसाही टॉवरवर बसलेला दिसतो. नागरिकांना तो वरून प्रतिसादही देतो. अधिकारी आले की त्यांना आपल्या मागण्या सांगतो. ४२ अंशाच्या वर असलेल्या तापमानात श्यामला उष्माघाताचा फटका बसला काही बरेवाईट झाले तर काय, या प्रश्नाने प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. आता श्याम खाली कधी उतरतो, त्या मागण्या मान्य होतात काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)आंदोलनावर ठाम श्याम गायकवाड याची तिसऱ्या दिवशीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. इसापूरच्या सरपंचांनी त्याला सलग दोन दिवस सुट्या असल्याने आंदोलनाकडे कोणी लक्ष देणार नाही, असे सांगितले. परंतु त्याने आपण खाली उतरणार नाही, उलट आपला प्राण गेला तर शेत सर्वे नं. २१ मध्ये आपल्यावर अंत्यसंस्कार करावे, असे म्हटले.
तळपत्या उन्हात श्याम तीन दिवसांपासून दिग्रसच्या टॉवरवर
By admin | Updated: April 23, 2016 02:40 IST