यवतमाळ : गावगाड्यातील तंटे समोपचाराने मिटवून गावागावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ५९० गावे संपूर्ण तंटामुक्त झाली आहे. गावांमध्ये स्थापन झालेल्या तंटामुक्त समित्यांनी तब्बल १९ हजार तंटे समोपाराने मिटविले आहे. या योनेंतर्गत गावातच तंटे मिटत असल्याने न्यायालयाचे उंबरठे झिजविण्यासोबतच होणार्या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून या योजनेने दिलासा दिला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोहिमेचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अश्विन मुद्गल व पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नियोजनपूर्वक काम केल्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५९० गावे पूर्णपणे तंटामुक्त झाली आहे. यापैकी १२९ गावांचे मूल्यमापन झाले असून घोषणा तितकी शिल्लक आहे. पूर्वीच्या या गावांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनाच्यावतीने पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. तर यापैकी सात गावांना विशेष पुरस्कार देण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १२०७ ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायतींच्या ठिकाणी तंटामुक्त गाव समित्या स्थापन झाल्या आहे. गावकर्यांना तंटामुक्त मोहिमेचे महत्त्व कळावे तसेच योजनेची योग्य अंमलबजावणी होऊन तंटे समोपचाराने सोडविण्यासाठी सर्व गावांना शासन निर्णय व त्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेले आदेश गावकर्यांपर्यंत पोहचूवन त्याबाबत गावकर्यांना मार्गदर्शन करण्यात येते. गावगाड्यात निर्माण झालेल्या वादातून प्रकरण पोलिसात जाते व नंतर न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू होते. यासाठी तक्रारकर्ते व ज्यांच्या विरोधात तक्रार आहे अशांना पोलीस ठाणे व नंतर न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागते. न्यायालयात अनेक वर्ष प्रकरण सुरू राहात असल्याने दोनही पक्षांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तंटामुक्त अभियानाने मात्र या सर्व बाबींपासून गावकर्यांची सुटका केली आहे. या योजनेचे महत्त्व पटल्याने गावकरी स्वत:हून आपले छोटे-मोठे तंटे तंटामुक्त गाव समितीसमोर ठेवून ते निकाली काढून घेत असल्याचे चांगले चित्र गावागावात पाहावयास मिळते. गावकर्यांमध्ये झालेली जनजागृती व प्रशासनाच्यावतीने होत असलेल्या योग्य अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील अनेक गावातच या योजनेच्या माध्यमातून सोडविण्यात आले आहे. पहिल्या वर्षी तंटामुक्त झालेल्या गावांना २५ लक्ष रुपये बक्षिसाच्या रूपात वितरित करण्यात आले. दुसर्या वर्षी २००८-०९ मध्ये दोन कोटी २४ लाख, २००९-१० मध्ये एक कोटी १४ लाख, २०१०-११ मध्ये तीन कोटी ८९ लाख, २०११-१२ मध्ये दोन कोटी २३ लाख इतकी रक्कम गावांना वितरित करण्यात आली. २०१२-१३ मधील १२९ गावांची घोषणा झाल्यानंतर त्या गावांनाही रक्कम वितरित केली जातील. या रकमेतूनही गावात विकासाची कामे करण्यास मोलाचा हातभार लागला आहे. (शहर प्रतिनिधी)
५९० गावे झाली तंटामुक्त
By admin | Updated: May 19, 2014 23:54 IST