सिंचनाचा वांदा : सहा हजार शेतकऱ्यांना जोडणीची प्रतीक्षा यवतमाळ : सिंचनातून समृध्दीचा ध्यास घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी खोदल्या. धडक सिंचन विहिरीच्या रूपाने त्यात आणखी भर पडली. मात्र समृध्दीचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी विद्युत कंपनीने आडकाठी आणली. परिणामी कोट्यवधींच्या खर्चानंतरही सिंचनाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका आणि खासगी सावकारांचे कर्ज काढून विहिरी बांधल्या. अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेतून धडक सिंचन विहिरी मिळाल्या. यातून जिल्ह्यात सिंचन क्रांती घडण्याची आशा पल्लवित झाली होती. मात्र शेतकऱ्यांना वीज जोडण्याच मिळाल्या नाही. सिंचन विहीर पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी विद्युत कंपनीकडे अर्ज सादर केले. गेली दोन वर्षांपासून बहुतांश शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही. जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी वीज जोडणीसाठी कंपनीकडे येरझारा मारत आहे. मात्र त्यांच्या पदरी निराशा येत आहे. आज, उद्या असे करत पावसाळा तोंडावर आला. मात्र वीज कंपनीचा नवा करार झाला नाही. यातूनच वीज जोडण्या खोळंबल्या आहेत. पाठपुरावा करण्यात कंपनी अपयशी ठरली. परिणामी शेतकऱ्यांना मोठा हादरा बसला आहे. कोटेशनची रक्कम भरून दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही कुठल्याही हालचाली झाल्या नाही. (शहर वार्ताहर)
पाणी आहे, पण वीज नाही
By admin | Updated: June 16, 2014 23:43 IST