आर्णी : ५० हजार लोकसंख्या असलेल्या आर्णी शहरात सध्या अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच सध्या डेंग्यू, मलेरियाचा आजारही पसरत आहे. तरीही प्रशासन साफसफाईकडे दुर्लक्ष करीत आहे. कारण कचरा उचलण्यासाठी यंत्रणाच नाही.
आर्णी शहरात साथरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ग्रामीण रुग्णालय, खासगी रुग्णालयात दररोज रुग्ण येत आहेत. प्रत्येक कुटुंबात एखादा रुग्ण, अशी भयावह परिस्थिती आहे. नगरपरिषदेकडून यावर पाहिजे तशी उपाययोजना होताना दिसत नाही. गंभीर म्हणजे, आर्णी नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नाही. नगरपरिषदेकडून कचरा उचलण्यासाठी सात मालवाहू गाड्या आहेत. यापैकी दोन गाड्या बंद आहे. पाच गाड्यांच्या भरवशावर शहरातील कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. यातही या पाच वाहनांवर चालक नाहीत. सफाई कर्मचारीच या गाड्या चालवीत आहेत. त्यामुळे दररोज कचरा उचलला जात नाही. एकदा कचरा उचलला की, तिथे परत तीन ते चार दिवस गाडी फिरकत नाही. शहरात अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई नाही, कचराही रस्त्यावर पडलेला आहे. डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी यावर ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे.
कोट
नगरपरिषदेकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा वापर करून दररोज कचरा उचलणे सुरू आहे. गाड्या कमी असल्याने प्रत्येक भागात दररोज कचरा उचलणे शक्य होत नाही.
- मंगला रमेश ठाकरे, आरोग्य सभापती, नगर परिषद आर्णी
कोट
शहरात साथरोग मोठ्या प्रमाणावर आहे. रुग्णालयात दररोज मेंदूज्वर, डेंग्यू, मलेरिया, निमोनिया अशा विविध आजारांचे शंभरावर रुग्ण येत आहेत. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. सुनील भवरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय आर्णी
200921\img_20210920_140209.jpg
आर्णीत शहरात पडलेला कचरा