दिग्रस : सध्या पावसाळ््याचे दिवस सुरू आहे. ग्रामीण भागात पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते. या दूषित पाण्यामुळे डायरिया, काविळ, टायफाईड आदी साथीचे आजार पसरण्याची भीती असते. यासाठी नागरिकांनी पाणी शुद्धतेची काळजी घ्यावी, पाणी उकळून, गाळून घेऊन त्यात जीवन ड्रॉप द्रावण टाकावे, असे आवाहन येथील आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील नळयोजनेसह ग्रामीण भागातील विहिरी आणि हातपंपाच्या शुद्धतेबाबत प्रभावी उपाययोजना दिसत नाही. अनेक जलस्त्रोत घाणेरड्या ठिकाणी आहे. त्यामुळे पाणी शुद्धिकरण करणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकूण क्लोरिनेशन करणे गरजेचे आहे. पाण्याची नियमित ओटी टेस्ट घ्यावी, गावामध्ये असणाऱ्या नाल्या वाहत्या कराव्या, डबकी साचणार नाही याची काळजी घ्यावी, पिण्याचे पाणी घेण्यासाठी डवल्याचा वापर करावा, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, बाहेरील पाणी पिण्याचे टाळावे, उघड्यावरील शिळे अन्न खाऊ नये, पाण्यच्या स्त्रोतापासून १०० फुटाच्या अंतरावर खताचे खड्डे असल्यास त्याची विल्हेवाट लावावी, आदी सूचना केल्या आहे. याउपरही जलजन्य रोगाचे रुग्ण आढळून आल्यास अंगणवाडी सेविका किंवा अशा स्वयंसेविकांना माहिती द्यावी. तसेच जवळच्या दवाखाण्यात जाऊन रुग्णांची तपासणी करावी. उपहारगृहे, खानावळ, बसस्थानक आदी ठिकाणचे पाण्याचे साठे निरजंतुक राहतील याची काळजी घ्यावी. ग्रामीण नळयोजनेच्या टाक्या नियमित स्वच्छ करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)
पाणी शुद्धतेची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 00:05 IST