आर्णी : तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्णी शाखेसमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन बँक व्यवस्थापक व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील बहुतांश शेतकरी पीककर्जापासून अद्यापही वंचित आहे. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी यावर्षी खूप अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्या, जुन्या सभासदांकडील थकीत असलेल्या कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, आजपर्यंत बँकेने भागभांडवलाची जमा केलेली रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. धरणे आंदोलनात अध्यक्ष रवी राठोड, नीलेश मस्के, उत्तम राठोड, लिंगाजी मंगाम, स्वप्नील साठे, रामेश्वर जाधव, रमेश ठाकरे, प्रवीण मुनगिनवार, जितू राठोड, अशोक शिंदे, गोकुळ शेगर, जमीर खान, उज्ज्वल मोरे, अमोल जाधव, राजू भारती, नामदेव बासरवाड, राजू पहूळ, किरण वानखडे, दिनेश कर्णेवार यांच्यासह असंख्य नागरिक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे
By admin | Updated: August 3, 2015 02:18 IST