जिल्हा परिषद : कोट्यवधींचे साहित्य निकृष्ट दर्जाचेयवतमाळ : जिल्हा परिषदेकडून सेस फंडातून कृषी विभाग, समाजकल्याण विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी मोठे अनुदान देऊन कृषी साहित्य पुरविले जाते. प्रत्यक्षात मात्र या साहित्यांचा दर्जा सुमार असल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. साहित्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाला असता दर करारानुसार एमएआयडीसी आणि एमएसएसआयडीसी यांनी मंजूर केलेल्या पुरवठादाराकडूनच या वस्तू घेण्यात आल्याचे सांगितले जाते. एक प्रकारे ही खरेदी प्रक्रिया शासनस्तरावरून होत असल्याचे दाखवून सेस फंडाला सुरुंग लावला जात आहे.जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आणि एमएसएसआयडीसी आणि एमएआयडीसी येथील पुरवठादार यांच्यात समेट घडवून आणण्याचे काम यवतमाळातील एका व्यक्तीकडून केले जाते. त्याने प्रत्येकाचा मुबोला धडा निश्चित केला आहे. त्यामुळे सर्व डिलिंग याच माध्यमातून होते. साहित्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असता अधिकारीवर्ग पुरवठादार निश्चित करणाऱ्या एमएसएसआयडीसी आणि एमएआयडीसी या संस्थांकडे बोट दाखवून मोकळे होतात. यामुळे जिल्हा परिषद सेस फंडातील कोट्यवधी रुपये खर्च होवूनही शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू मिळत नाही. बरेचदा पदाधिकारीवर्गही याकडे दुर्लक्ष करतो. सध्या समाजकल्याण विभाग आणि कृषी विभागातील साहित्य अजूनही पंचायत समितीस्तरावर पडून आहे. पीव्हीसी पाईप व बैलगाड्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र याची अधिकृत तक्रार नसल्यामुळे चौकशी करता येत नाही, असाही पवित्रा काही अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. पंचायत समितीस्तरावर नियमित गोदामाऐवजी काही खासगी ठिकाणीही माल ठेवण्यात आला आहे. कागदोपत्री पुरवठा व वितरण मेंटन केले जाते. गुणवत्तेबाबत मात्र कुणीही बोलण्यास तयार नाही. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी केली जाते. समाजकल्याण विभागातून २०१२-१३ मध्ये खरेदी करण्यात आलेले भजनी साहित्य निकृष्ट दर्जाचे निघाले. ते साहित्य पुरवठादारास परत करून दर्जेदार साहित्य मागविण्याचा ठरावही जिल्हा परिषदेने घेतला होता. यामध्ये जवळपास २० लाखांची उलाढाल करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष कोणतीच कारवाई झालेली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
सेस फंडातील साहित्याला पुरवठादारांचा सुरुंग
By admin | Updated: July 17, 2015 02:25 IST