पांढरकवडा : पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश क्षमता वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी येथील प्रकल्प कार्यालयात शनिवारी तीन तास ठिय्या दिला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी यवतमाळ येथील वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता ८५ ने वाढवून दिल्याचा आदेश वाचून दाखविल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यवतमाळ येथील तीन आणि पांढरकवडासह जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशास इच्छुक जवळपास १०० विद्यार्थ्यांनी दुपारी १ वाजता प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. त्यावेळी अनेक कर्मचारी बाहेर निघून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकाऱ्यांना देऊन नारेबाजी सुरू केली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला. परंतु विद्यार्थी आपल्या भूमीकेवर ठाम होते.दुपारी ४ वाजता प्रकल्प अधिकारी प्रशांत रुमाले यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी त्यांच्यापुढे वाढीव जागांसह शिष्यवृत्ती, पुस्तके, भोजन आदी समस्यांचा पाढा वाचला. यावर प्रकल्प अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देतानाच यवतमाळ येथील वसतिगृहाला ८५ जागा वाढवून दिल्याचा आदेश वाचून दाखविला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात प्रफुल्ल गेडाम, रामेश्वर कुमरे, किशोर शेडमाके, धर्मेंद्र मेश्राम आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: September 7, 2014 00:10 IST