माहूर : शासकीय आदिवासी वसतिगृहातील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना माहूर येथे घडली. वसतिगृह अधीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत पालकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. बाळू दिगांबर खुपसे (१६) रा. अनमाळ ता. माहूर असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो येथील ग्यानबा केशवे विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होता. शासकीय आदिवासी वसतिगृहात राहत होता. या वसतिगृहात पाणी, शौचालय आणि स्नानगृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थी शहरातील उघड्या विहिरीवर आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी जातात. नेहमी प्रमाणे तीन विद्यार्थी रविवारी आंघोळीसाठी गेले. विहिरीत उतरुन पोहत असताना बाळू बुडाला. त्याच्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धाऊन आले. शर्तीच्या प्रयत्नानंतरही त्याला बाहेर काढण्यात यश आले नाही. अखेर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याला बाहेर काढले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती अनमाळला पोहोचताच नातेवाईकांनी माहूर गाठले. अधीक्षकांवर कारवाईची मागणी करीत शवविच्छेदनानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला.(वार्ताहर)
वसतिगृह विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू
By admin | Updated: September 21, 2014 23:59 IST