वणी : नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला असून नवीन वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न व इतर दाखल्यांची आवश्यकता असते. ही दाखले काढण्यासाठी वणी येथील सेतू केंद्रात विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली आहे.विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची तारीख जवळ येत असल्याने दाखले त्वरित मिळवण्याकरिता पालक व विद्यार्थी सकाळी ९ वाजतापासून, तर रात्री ८ वाजेपर्यंत तहसील कार्यालयाच्या परिसरात तळ ठोकून बसतात. उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखल्यावर आॅनलाईन डीजीटल स्वाक्षरी करण्यात येते. दिवसभर सेतूमधील नेटवर्क राहत नसल्याने हे दाखले विद्यार्थ्यांना कालावधी लोटूनही मिळत नाही. तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार प्रभारी असल्याने तसेच दिवसभर नेटवर्क राहत नसल्याने दाखल्यावर आॅनलाईन स्वाक्षऱ्या होत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक दररोज सेतू केंद्रात चकरा मारत आहे.दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, अधिवास, राष्ट्रीयत्व, अशा अनेक दाखल्याची गरज असते. तहसीलचे नेटवर्क सेतू केंद्रावर आधारीत असल्याने सेतू केंद्र रिचार्ज पुरेपूर करीत नाही. नेहमी नेटवर्कची समस्या नागरिकांना सांगून आल्यापावली परत पाठविल्या जात आहे. सेतू केंद्रात काम करणारे कर्मचारी अर्जदाराच्या अर्जामध्ये चुका, प्रमाणपत्र स्पेलिंगमध्ये चुका, अशा अनेक चुका करीत असल्यानेही नागरिक त्रस्त झाले आहे. दाखल्यावर डीजीटल स्वाक्षऱ्या करण्यास अधिकाऱ्यांकडून विलंब का होत आहे, हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे. या सर्व समस्याचे निराकरण करावे, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
दाखल्यासाठी सेतूमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी
By admin | Updated: June 20, 2016 02:14 IST