शिक्षकांची वाणवा : जिल्हा परिषदेकडून दुर्लक्षसावळी-सदोबा : आवश्यक तेवढे शिक्षक देण्यास चालढकल होत असल्याने केळझरा (वरठी) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणे पालकांनी बंद केले आहे. गेली तीन दिवसांपासून कार्यरत शिक्षक वर्गखोल्या उघडून विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करत आहे. एक ते सातपर्यंत वर्ग आणि ८८ पटसंख्या असलेल्या या शाळेसाठी पाच शिक्षक मंजूर आहे. प्रत्यक्ष तीन शिक्षक कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत या प्रकाराची तक्रार मांडण्यात आली. शाळेला कुलूप ठोकण्यााही इशारा देण्यात आला. या नंतरही जिल्हा परिषदेने मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष सुधाकर लिंगायत, रूपेश खरतडे, डॉ.दीपक स्थूल, मंगला चौधरी, वनिता मानकर, अर्चना भगत, दीपक मादेश्वर, एस.टी. भगत यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. दोन दिवसात शिक्षक न दिल्यास विद्यार्थ्यांचे दाखले काढून घेतले जाईल, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
केळझरच्या शाळेत विद्यार्थी पाठविणे बंद
By admin | Updated: September 18, 2014 00:08 IST