जिल्हा ७८ टक्के : ‘जायन्ट्स’ची आरोही अमीन जिल्ह्यात अव्वल, यंदाही मुलींची बाजी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ७८.०३ टक्के लागल. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ७४.४२ असताना ८२.२३ टक्के मुलींनी उत्तीर्ण होऊन पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली. येथील जायन्ट्स स्कूलची विद्यार्थिनी आरोही अनिल अमीन ही १०० टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. निकालात अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा ७८.०३ टक्क्यांसह सर्वात कमी निकाल देणारा जिल्हा ठरला. अमरावती ८५.१५, अकोला ८४.०२, बुलडाणा ८८.४९, वाशीम जिल्ह्याचा निकाल ८७.३७ टक्के लागला. जिल्ह्यातून यंदा दहावीच्या परीक्षेला ४० हजार ६५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१ हजार ७२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर तब्बल ८ हजार ९३४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ४ हजार ३७० जणांनी विशेष प्राविण्यश्रेणी मिळविली. प्रथम श्रेणीत १० हजार २०१, द्वितीय श्रेणीत १३ हजार १९६, तर तृतीय श्रेणीत ३ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यवतमाळातील जायन्ट्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या आरोही अनिल अमीन हिने १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात इतिहास रचला. तिला बेस्ट फाईव्ह विषयांच्या एकूण ५०० गुणांपैकी ४९०, तर क्रीडाचे १० गुण मिळाल्याने ५०० पैकी ५०० गुण मिळून ती १०० टक्के यशाची मानकरी ठरली. दिग्रसचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांची कन्या व मोहनाबाई कन्याशाळेची विद्यार्थिनी प्रणवती प्रमोद सूर्यवंशी, दिनबाई विद्यालयाचा साहील घोंगडे आणि यवतमाळातील फ्री मेथॉडिस्ट स्कूलची विद्यार्थिनी आदिती ओमप्रकाश पिंपळकर हे तिघे ९९.४० टक्के घेऊन जिल्ह्यात द्वितीय आले. यवतमाळच्या नंदूरकर शाळेतील प्रतीक सतीश काळे आणि दिग्रसच्या दिनबाई शाळेचा वैभव आडे, घाटंजीच्या समर्थ विद्यालयाची हर्षदा नितीन भोरे हे तिघे ९८.८० टक्के गुणांसह जिल्ह्यात तृतीय आले. नंदूरकर शाळेतील श्रावणी मदन देशमुख, राणी लक्ष्मीबाई शाळेची साक्षी विनोद इंगोले (९८.६०), जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची साक्षी सुरेंद्र राठी (९८.४०), लोकनायक अणे विद्यालयाचा राजस हर्षवर्ध राखे (९७.८०) यांनीही उत्तम कामगिरी केली. शिक्षणाधिकारीच अनभिज्ञ दहावीच्या निकालाची टक्केवारी नेमकी कशी काढली जाते, याबाबत येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी हे स्वत:च अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. टक्केवारी काढण्याच्या पद्धतीबाबत आपल्याला माहिती नाही, असे स्पष्ट करताना वंजारी यांनी शिक्षण मंडळाशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. बेस्ट आॅफ फाईव्ह आणि क्रीडा व कला गुण मिळूनच टक्केवारी काढली जाते. यात कोणत्याही स्थितीत कुणालाच शंभर टक्केच्यावर गुण मिळणार नाही, याची दक्षता घेतली जाते. - संजय यादगिरे सचिव, अमरावती विभागीय शिक्षण मंडळ ८२ टक्के मुली उत्तीर्ण दहावीच्या निकालात गेल्या काही वर्षांपासून मुलींचीच सरशी होत आहे. हेच चित्र यंदाही कायम राहिले. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला २१ हजार ८९२ मुले, तर १८ हजार ७६४ मुली बसल्या होत्या. त्यापैकी १६ हजार २९३ मुले उत्तीर्ण झाली, तर १५ हजार ४२९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ८२.२३ टक्के इतकी मुलींच्या यशाची सरासरी आहे. तसेच अनुत्तीर्ण झालेल्या ८ हजार ९३४ जणांपैकी मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या १८ जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
दहावीच्या निकालात जिल्हा विभागात ढांग
By admin | Updated: June 14, 2017 00:15 IST