एकाचा मृत्यू : सात जणांना विषबाधा, एकाच कंपनीच्या औषधाची रिअॅक्शनसुरेंद्र राऊत यवतमाळ कधी नव्हे ती जिल्ह्यातील पीक परिस्थिती यंदा उत्तम आहे, अशा स्थितीत अधिक उत्पादनासाठी शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करीत आहे. मात्र फवारणी करताना जिल्ह्यात विविध ठिकाणी सात जणांना विषबाधा झाली. तर एका शेतमजुराचा मृत्यू झाला. विषबाधा झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकाच कंपनीच्या विशिष्ट औषधाने रिअॅक्शन आल्याने सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील पीक स्थिती उत्तम आहे. त्यामुळेच शेतकरी वर्गही पिकाच्या संगोपनात गुंतला आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्याचे नियंत्रण करण्यासाठी किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात गॅस पॉयझन असलेल्या किटकनाशकांचा वापर करत आहे. फवारणीची चुकीची वेळ आणि वाऱ्याची दिशा न लक्षात घेता फवारणी केल्यामुळे किटकनाशक फवारणी करणाऱ्याच्या अंगावर उडते. यातूनच विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाचवेळी जिल्ह्यातील सहा जणांना विषबाधा झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सर्वांनाच एकाच कंपनीच्या किटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाली आहे. राळेगाव तालुक्यातील बोरी ईजोड येथील अमर प्रकाश आत्राम (२१) हा कपाशीवर फवारणीसाठी गेला होता. त्याला घरी आल्यानंतर उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे शासकीय रुग्णालयात दाखल केल. यवतमाळ तालुक्यातील कारेगाव यावली येथील बंडू उत्तम राठोड (२१) यालाही फवारणी करून आल्यानंतर विषबाधा झाली आहे. सुनील तुळशीराम राठोड (२३) रा. किन्ही (तिवसाळा) ता. घाटंजी याने स्वत:च्या शेतातच दिवसभर कपाशीवर फवारणीचे काम केले. रात्री त्याची प्रकृती गंभीर झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेर तालुक्यातील मालखेड बु. येथील अब्दुल खलीद अब्दुल करीम (४५), नांदगाव तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील नसीब खाँ पठाण (३५), गजानन वाघाडे (२७) यांनाही शेतात फवारणी करताना विषबाधा झाली. सर्व जणांनी एकाच कंपनीचे औषध फवारताना विषबाधा झाली आहे. यापूर्वीही फवारणीचे काम केले, मात्र असा त्रास जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले. गॅस पॉयझन असल्याने त्याचा थेट मेंदूवर आघात होत असल्याचे सांगण्यात आले. श्वसनाच्या माध्यमातून हवेतील विषाचे तुषार शरीरात जातात. यातूनही विषबाधा होण्याची शक्यता असते. सध्या कोरडे वातावरण असून, दिवसा उनं तापत आहे. सोबतच किटकनाशकांतून निघणारी वाफ याचा परिणाम होतो. शरीराला घाम येतो. या घामाच्या माध्यमातूनच अंगावर पडलेले किटकनाशक शरीरात जाते. त्यामुळेही विषबाधा होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले. आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागली होती. आता पाऊस आल्याने पीक स्थिती उत्तम आहे. मात्र फवारणीतून होणारे विषबाधेचे नवीन संकट निर्माण झाले आहे. यातून वाचण्यासाठी योग्य दक्षता हाच उपाय ठरु शकतो. ज्या वेळेस हवा वाहात नाही अशा काळात फवारणी करावी अशीही सूचना कृषी तज्ज्ञांकडून केली जात आहे. विषबाधेने मृत्यूडोंगरखर्डा : कळंब तालुक्यातील पिंपळशेंडा येथील शेतकरी रामा मारूती मेश्राम (५०) याचा फवारणी करताना झालेल्या विषबाधेने मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी फवारणी करण्यात आली. घरी आल्यावर त्याला चक्कर येऊ लागली. तसेच पोटातही दुखत होते. त्यामुळे त्याला राळेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याला विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्याकडे पाच एकर शेती असून मुलगा आणि मुलगी आहे.‘मेडिकल’चे व्हेन्टीलेटर बिघडल्याने रुग्ण रेफरयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण सहा व्हेन्टीलेटर आहेत. मात्र यातील दोन व्हेन्टीलेटर मागील चार महिन्यांपासून बंद आहे. वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही याची दखल घेण्यात येत नाही. केवळ चार व्हेन्टीलेटरच्या भरवशावर उपचार सुरू आहे. विष प्राशनाचे सर्वाधिक रुग्ण येत असल्याने उपचार करताना अडचण निर्माण होते. रानडुकराच्या हल्ल्यात चार महिला गंभीर शिरसगाव पांढरी : रानडुकराने हल्ला केल्याने चार महिला मजूर जखमी झाल्याची घटना नेर तालुक्यातील शिरसगाव येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. शिरसगाव येथील शेतकरी विठ्ठलराव ढबाले यांच्या शेतात सकाळी ८ वाजता महिला निंदण करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका झाडाखाली महिला भोजनासाठी बसल्या. त्यावेळी अचानक एक रानडुकर तेथे आले. आणि त्याने महिलांवर हल्ला केला. यात बेला अर्जून तायडे (४०), तारा रमेश पवार (३७), निर्मला अण्णा घोडे (४०), अन्नपूर्णा हरिदास वयले (५५) असे जखमी महिलांचे नाव आहे. त्यांना नेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)
फवारणी उलटली जीवावर
By admin | Updated: August 21, 2015 02:46 IST