यवतमाळ : नागरिकांनी शरीरात गाठ आली म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. कारण, ८० टक्के गाठी या कॅन्सरच्या नसतातच. शिवाय कॅन्सरने तत्काळ मृत्यूही होत नाही. वेळीच उपचार घेतल्यास दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील कॅन्सरचा रुग्णही ठणठणीत होऊ शकतो, अशा शब्दात सेंट्रल इंडिया कॅन्सर इन्स्टिट्यूटचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. अजय मेहता यांनी नागरिकांना दिलासा दिला.सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राम भारी येथे कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भारीचे सरपंच वासुदेव गाडेकर, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, अधीक्षक डॉ. किशोर इंगोले आदी उपस्थित होते.या शिबिरात कॅन्सरबाबत रुग्णांमधील भीती घालविताना आणि त्यांना या आजाराच्या लक्षणांची जाणीव करून देताना डॉ. मेहता बोलत होते. कॅन्सर या विषयावर व्याख्यान देताना डॉ. मेहता म्हणाले, देशात अनेकांना कॅन्सर आहे. मात्र त्याची श्रेणी तीन व चार अशी आहे. त्यांनी वेळीच उपचार घेणे महत्त्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी) आजारांची प्रतीक्षा न करता नियमित तपासणी करा - विजय दर्डा याप्रसंगी खासदार विजय दर्डा म्हणाले, डॉ. अजय मेहतांसारखे कॅन्सर तज्ज्ञ भारीसारख्या छोट्याशा गावात व्याख्यानासाठी येणे ही खूप मोठी उपलब्धी आहे. ते ३०० ते ४०० खाटांचे स्वत:चे रुग्णालय बांधत आहेत. त्यातून वेळ काढून ग्रामीण रुग्णांना ते आपली सेवा देत आहेत. बुटीबोरी येथे मंगळवारी सुमारे १ हजार २०० महिलांच्या रोगनिदान शिबिरात त्यांनी मार्गदर्शन केले. भारीच्या रुग्ण तपासणी शिबिरासाठी देशातील पहिली अत्याधुनिक चेकअप व्हॅन बोलविण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे ती आज उपलब्ध होऊ शकली नाही. नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत दक्ष राहावे, आजाराची लागण होण्याची प्रतीक्षा न करता नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, त्यामुळे आजार रोखणे, त्याला वेळीच प्रतिबंध घालणे सहज शक्य होईल. विजय दर्डा म्हणाले, ज्योत्स्ना दर्डा यांनी कॅन्सरच्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी २५ वर्षांपूर्वी खेड्यापाड्यात काम सुरू केले. कॅन्सरसह कोणताही आजार दूर फेका, असे नेहमीच त्या सांगत होत्या. यवतमाळ व परिसरातील कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी मुंबई, नागपूरला जावे लागते. मात्र गरिबांना ही बाब परवडणारी नाही. उपचाराअभावी त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात रेडिओथेरपी आणि किमोथेरपीची व्यवस्था व्हावी यासाठी आपण पुढाकार घेणार असून राज्याचे आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांना भेटून पाठपुरावा करणार असल्याचे दर्डा यांनी स्पष्ट केले. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्याकडे १०० कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाचा आता विद्यमान आरोग्य मंत्री जे.बी. नढ्ढा यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही दर्डा यांनी सांगितले.
ज्योत्स्ना दर्डा स्मृती कॅन्सर तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: March 19, 2015 02:17 IST