उमरखेडमध्ये सर्वाधिक खरेदी : जिल्ह्यात दोन लाख क्ंिवटलची आवक, व्यापाऱ्यांची मनमानी यवतमाळ : अस्मानी संकटाला तोंंड देत घरात आलेल्या सोयाबीनचा खरेदीत मात्र आधार तुटला. आधारभूत किंमती खाली खरेदी सुरू असल्याने बळीराजाची आर्थिक कोंडी सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असतानाच व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू केली आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. परिणामी शेतकरी नाडवला जात असल्याचे चित्र सर्वदूर आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख क्ंिवटल सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. यात उमरखेड टॉपवर आहे. खरेदी करताना व्यापाऱ्यांनी मात्र दोन हजार ७७५ रुपये प्रति क्ंिवटल हा आधारभूत दर गुंडाळून ठेवला आहे. सोयाबीन बाजारात येण्याची सुरूवात होत नाही तोच भाव पाडण्यात आले. दिवाळीत शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेत केवळ एक हजार ८०० रुपये क्ंिवटल दराने खरेदी करण्यात आली. या काळातच मोठी उलाढाल झाली. पुढे आवक थोडीफार कमी होताच दोन हजार-दोन हजार ४०० ते दोन हजार ७०० पर्यंत भाव नेऊन ठेवण्यात आला. हाच यावर्षीचा सर्वाधिक दर सध्या तरी ठरला आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनने मार खालल्यानंतर व्यापाऱ्यांकडून कमी दराचा दणका सहन करावा लागत आहे. गतवर्षी तीन हजार ७०० प्रति क्ंिवटल दराने सोयाबीनची खरेदी झाली होती. यावर्षी तब्बल एक हजार रुपये घसरण झाली आहे. नाफेडने आपले खरेदी केंद्र सुरू केले असले तरी ते नामधारीच ठरत आहे. सोयाबीनचा एकही दाणा या एजंसीकडे शेतकऱ्यांनी दिला नाही. विविध अटी ठेवल्याने शेतकऱ्यांनी या एजंसीकडे पाठ फिरविली आहे. दाणा ओला नको, कुठलाही कचरा नको, सातबाऱ्यावर सोयाबीनच्या पेऱ्याची नोंद असावी. यानंतर खरेदी झालेल्या सोयाबीनचे पैसे धनादेशाच्या माध्यमातून मिळणार आहे. हा धनादेश पाच ते आठ दिवसात वटविला जातो. यासोबतच थकीत कर्ज कापले जाण्याचीही भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. यामुळे नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. नाफेडने खुल्या बाजारात उतरुन हमी दराने सोयाबीनचे खरेदी केली तर खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव वाढतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल. यासोबतच १६ ही तालुक्यात केंद्रांची आवश्यकता आहे. (शहर वार्ताहर)
सोयाबीन खरेदीत ‘आधार’ तुटला
By admin | Updated: November 10, 2016 01:28 IST