पावसाची उघडीप : दुष्काळी वर्षानंतर हवामानाचा अंदाज फेलयवतमाळ : जिल्ह्यात पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी पेरण्याची गती वाढविली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज नाही तर उद्या पाऊस बरसेल, या आशेवरच तीन लाख २६ हजार हेक्टरवर पेरण्या आटोपल्या. प्रत्यक्षात पावसाने अनेक भागात उघडीप दिली. यामुळे पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. जिल्ह्यात २५ जूनपर्यंत सरासरी १०७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १० टक्के आहे. गतवर्षी या सुमारास बहुतांश पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र यावर्षी केवळ ३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने आयुक्त कार्यालयाकडे नुकताच सादर केला आहे. मान्सूनच्या पावसाची गती सर्वच परिसरात कायम राहते. यावर्षीचा मान्सून सर्वव्यापी असला तरी पावसाची गती संथ आहे. यामुळे काही भागात तुरळक बरसलेला पाऊस इतर भागात बरसला नाही. अशीच अवस्था शेत शिवारात पाहायला मिळत आहे. यामुळे काही भागात पावसाचा शिरवा तर कुठे कोरडे शिवार राहत असल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे तीन लाख २६ हजार हेक्टरवरच्या पेरण्या अधांतरी आहेत.आजचा ढग आपल्या शिवारात बरसणार किंवा नाही, याची शाश्वती मिळणे अवघड झाले आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. पेरण्या उलटणार तर नाही ना, म्हणून शेतकरी चातकाप्रमाणे वरूणराजाची वाट पाहात आहेत. (शहर वार्ताहर)८३ कोटींचा खर्च मातीमोल होण्याचा धोकाखरिपाची पेरणी करण्यासाठी दरवर्षी बाजारात २५० कोटींची उलाढाल होते. यामध्ये प्रामुख्याने खत आणि बियाण्यांचा समावेश आहे. पेरणीपूर्व मशागत आणि मजुरीचा खर्च तो वेगळाच आहे. शेतकऱ्यांची मेहनत ती वेगळीच. बियाणे आणि खताचा ३० टक्के खर्च ८३ क ोटींच्या घरात आहे. पावसाअभावी हा खर्च मातीमोल तर होणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले. काही शेतकऱ्यांनी सावकारांचे उंबरठे झिजविले. काहींनी घरातील दागदागिने गहाण ठेऊन किंवा मोडून पैशाची जुळवाजुळव केली. मात्र पाऊस नसल्याने त्यांच्यात चिंता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या संकटात
By admin | Updated: June 26, 2016 02:33 IST