पांढरकवडा : वनविभागातील क्षेत्रीय कामाच्या दृष्टीने वनपाल हे अत्यंत महत्वाचे पद आहे. मात्र २०११ पासून शासनाने थेट सरळसेवा भरती बंद करून संपूर्ण पदे पदोन्नतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला होता. आता विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन २५ टक्के वनपालांची पदे निवडीचा निर्णय शासनाने घेतल्याने वन हक्क समितीने समाधान व्यक्त केले आहे.वनपाल हे क्षेत्रीय पद आहे. या पदाच्या कामाचे स्वरूप बघता या पदावर किमान पदवीधर व्यक्ती असणे आवश्यक भासू लागले होते. त्यामुळे क्षेत्रीय कामाचा अनुभव असलेल्या तरूण वनरक्षकांमधून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन २५ टक्के वनपाल पदाच्या निवडीचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाबद्दल वनहक्क समितीने समाधान व्यक्त केले आहे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे स्वरूपदेखील योग्य असून या परीक्षेचा अभ्यासक्रम वनपाल पदाच्या कामकाजासाठी पुरेशा ज्ञानाची कसोटी पाहणारा असल्याचे समितीने म्हटले आहे. त्यामुळे विभागीय परीक्षेतून निवड झालेले वनपाल हे निश्चितपणे पदोन्नती व सरळसेवा वनपालांच्या तुलनेत सरस ठरतील, असा दावा समितीने केला आहे.विभागीय स्पर्धा परीक्षेचा हा निर्णय वनविभागात शैक्षणिकदृष्ट्या सक्षम कर्मचाऱ्यांची क्षेत्रीय फळी निर्माण करून खात्याच्या विकासासाठी उचललेले अत्यंत महत्वपूर्ण पाऊल असल्याने या निर्णयाचे वनहक्क समितीने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे पदवीधर वनरक्षकांना परीक्षा देऊन पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यात सामाधानाचे वातावरण दिसून येत आहे. विभागीय परीक्षेतून केवळ २५ टक्के वनपालांची पदे भरली जाणार आहे. त्यामुळे ७५ टक्के पदे पदोन्नतीनेच भरली जातील. तरीही वनरक्षक संघटनेने ही परीक्षा रद्द करण्याची केलेली मागणी दुर्दैवी असल्याचेही समितीने म्हटले आहे. (वार्ताहर)
वनपाल परीक्षेबद्दल समाधान
By admin | Updated: September 11, 2015 02:55 IST