यवतमाळ : शिवसेनेने जिल्ह्यात पक्ष विस्ताराचे मिशन हाती घेतले असून त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत येण्याची खुली आॅफर दिली जात आहे. शिवसेनेने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविली. यवतमाळ जिल्ह्यात या पक्षाला एकच जागा मिळाली. मात्र अन्य दोन मतदारसंघात हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यवतमाळ मतदारसंघात तर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला निसटता पराभव पत्करावा लागला. विधानसभेच्या सात पैकी पाच जागा पटकावून भाजपाची सरशी झाली असली तरी मंत्रिमंडळात शिवसेनेने राज्यमंत्री पद मिळवून जिल्ह्यात भाजपाला मात दिली आहे. एक आमदार असूनही मंत्रिपद आणून सेनेने जणू पाच आमदार असलेल्या भाजपाला धोबीपछाड दिली आहे. या मंत्रिपदाचा पक्षासाठी लाभ करून घेण्याच्या दृष्टीने शिवसेनेने सुरुवातीपासून अपेक्षेनुसार आक्रमक भूमिका घेतली आहे. उमरखेडपासून वणीपर्यंत शिवसेना आणखी मजबूत करण्यासाठी, नेटवर्क वाढविण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न केला जात आहे. पक्षाच्या विद्यमान कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवणे, नाराजीमुळे घरात बसलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात आणणे, पक्ष कार्यात त्यांना सक्रिय करण्याची मोहीम सुरु आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व अन्य पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना शिवसेनेत आणून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षात येण्याची खुली आॅफर दिली जात आहे. तुम्ही पक्षात या, तुमची कोणतीही कामे थांबणार नाहीत असा शब्द दिला जात आहे. या आॅफरचा कार्यकर्त्यांकडूनही गांभीर्याने विचार केला जात आहे. कारण ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षांच्या नेत्यांची धडपड थांबली आहे. बहुतांश नेते-पदाधिकारी जणू कोमात गेल्यासारखे वागत आहे. नेत्यांमध्येच समन्वय, एकजूट नाही. पर्यायाने कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले गेले आहे. पक्षात आता कुणी वालीच राहला नसल्याने हे अनेक कार्यकर्ते काठावर आहेत. पक्ष सोडण्याच्या मानसिकतेप्रत ते आले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात ही आॅफर पोहोचली आहे. त्याला प्राथमिक चर्चांमध्ये जोरदार प्रतिसादही मिळतो आहे. त्यातही दिग्रस-दारव्हा-नेर या सेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्यात दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत आणून पक्ष वाढीवर अधिक भर दिला जात आहे. गावागावातील कार्यकर्त्यांपर्यंत ‘तुम्ही केवळ पक्षात या’ अशी आॅफर पोहोचविली जात आहे. सरकारमधील मंत्रीपदाचा लाभ उठवित शिवसेना प्रचंड वेगाने पक्ष वाढीसाठी प्रयत्नरत आहेत. या उलट स्थिती सत्ताधारी भाजपात आहे. या पक्षात प्रचंड गटबाजी आहे. त्याचा अनुभव फ्लॉप झालेल्या वचनपूर्ती सोहळ्यातून नुकताच आला. भाजपात पक्ष वाढीच्या दृष्टीने फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यापेक्षाही वाईट अवस्था काँग्रेसमध्ये आहे. त्यांच्या पक्षाचे तर सदस्य होण्यासही कुणी तयार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)तुम्ही फक्त पक्षात या, सर्व कामे होतीलशिवसेनेत गेल्यावर खरोखरच आपला सन्मान होईल का याबाबत काही कार्यकर्ते साशंक आहेत. मात्र नेत्यांनी विश्वास दिल्यास ते सेना प्रवेशाचा निर्णय घेऊ शकतात, अशी स्थिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील निष्क्रियता आणि भाजपातील गटबाजीचा पुरेपूर फायदा पक्ष वाढीसाठी उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. सत्ता आणि मंत्रीपद आल्याने कार्यकर्त्यांमध्येसुद्धा उत्साह संचारला असून गावागावातील शिवसैनिक त्यासाठी कामाला लागले आहेत. सेना कार्यकर्त्यांची ही सक्रियता दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघात अधिक पहायला मिळते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या जागा वाढविण्याचा ध्यास नेत्यांनी घेतला आहे. त्यासाठी जोरदार पक्षबांधणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेतील पराभवापासून प्रचंड सामसूम पाहायला मिळत आहे. जिल्हाध्यक्षाला मुदतवाढ मिळाल्यानंतरही नवा कोणताही कार्यक्रम कार्यकर्त्यांसाठी जाहीर झालेला नाही. सध्या कार्यकर्त्यांना कोणतेही टार्गेट नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील काठावरच्या कार्यकर्त्यांकडून सेनेच्या आॅफरचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेची आॅफर
By admin | Updated: June 4, 2015 02:05 IST