दिग्रस : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रजा समाधानी होती. महिलांचा सन्मान हा प्राधान्याचा विषय होता. त्या काळी शेतकऱ्यांच्या मालाचा भाव शेतकरी स्वत: ठरवित होता. सैनिक किंवा राज्याचा कुणीही अधिकारी शेतकऱ्यांच्या संपत्तीचा गैरवापर करू शकत नव्हता. अशा अनेक प्रजेच्या हितांच्या बाबीचे पालन शिवराज्याच्या काळात होत होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध युवा विचारवंत प्रा.अमोल मिटकरी यांनी केले.ते सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीद्वारा आयोजित शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार ख्वाजा बेग यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र ही परिवर्तनाची भूमी आहे. जागतिक पातळीचे संत, विचारवंत या मातीत जन्माला आले. सारे जग ज्या महाराष्ट्राकडे प्रगतिशील विचारांचे उगमस्थान म्हणून मोठ्या आशेने बघते अशावेळी प्रतिगामी विचारधारा हा प्रगतिशील विचार संपवू पाहात आहे. म्हणून परत छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याची पुनर्स्थापना करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून त्यासाठी आपण प्रत्येकाने आपापल्या परिने कार्य केले पाहिजे, असेही प्रा. अमोल मिटकरी म्हणाले. यावेळी सुधीर देशमुख, विठ्ठलराव शिंदे, जावेद पटेल, मिलिंद मानकर, जावेद पहेलवान, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, श्याम पाटील, विवेक वानखडे, सुभाष अटल, कल्पना देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष सीमा शिंदे, राजश्री देशमुख, डॉ.प्रा.अपर्णा पाटील, प्रा.गणवीर, शेषराव गोडवे, मजहर खान, अफजल खान, डॉ.टेवरे, रमाकांत काळे, विलास निकम, सुरेश चिरडे, उद्धव अंबुरे, अशोक गावंडे, दीपक चव्हाण, रामकृष्ण इंगोले आदींसह असंख्य शिवभक्तींची यावेळी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
शिवशाहीत रयत समाधानी होती
By admin | Updated: February 18, 2015 02:17 IST