शिंदोला : ग्रामीण भागातील गावशिव आणि ग्रामीण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पांदण रस्ते व गावाशिव नामशेष होत आहेत़ दुसरीकडे धुऱ्यावरून मात्र शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत. तालुक्यातील महसूल व भूमिअभिलेख कार्यालयाने तालुक्याच्या गाव रस्त्यांची व गावाशिवांना अतिक्रमणापासून रोखण्याची काळजी घेणे गरजेचे आहे़ मात्र शासकीय कर्मचारी कामात कुचराई करीत असल्याने अतिक्रमणाचा सपाटा वाढत आहे़ परिणामी जुने ग्रामीण रस्ते, पांदण रस्ते सध्या बेपत्ता झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे़ गावाशिवेचा रस्ता, पांदण रस्त्यावरील अतिक्रमणामुळे शेतीपयोगी माल, साहित्याची वाहतूक करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे़ परिणामी पांदण रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांची भांडणे होऊन प्रकरणे पोली, न्यायालयात पोहोचत आहेत. मात्र पांदण रस्त्याच्या, गाव रस्त्याचा प्रश्न सुटण्याऐवजी जटील होत आहे़ सोबतच वणी तालुक्यात वन विभाग व महसूल विभागाची हजारो एकर जमीन आहे़ त्यावर गिट्टी खाणीच्या उत्खननासाठी परवानगी देण्यात आली. तथापि लिजधारक शासनाकडून कमी जागेची लिज घेऊन जादा जागेवर उत्खनन करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचे ‘आर्थिक’ हित साध्य होत असल्यामुळे त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे.वणी तालुक्यातील कुर्ली, मेंढोली, मोहदा, शिरपूर, सुकनेगाव, पिंपरी आदी गावांच्या परिसरातील जंगलाची तोड करून त्या ठिकाणी शेती केली जात आहे़ परंतु वनविभाग बघ्याची भूमिका घेत या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे़ शासकीय जमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणेने वेळीच या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळतो, हे मात्र अनुत्तरीत आहे. (वार्ताहर)
शिव, ग्रामीण रस्ते नामशेष
By admin | Updated: September 18, 2014 23:43 IST