फुलसावंगी : बोरगाव जंगलात सागवान तस्करांनी आपले बस्ताण बसविले आहे. येथे मध्यरात्रीदरम्यान सागवान वृक्षांची कटाई करून चक्क ट्रकद्वारे तस्करी केली जात आहे.महागाव वनपरिक्षेत्रातील वनरक्षक, वनपाल, वनमजूर मुख्यालयी राहात नसल्याने सागवान तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. दर्यापूर (बोरगाव) या ४८३ कंपार्टमेंटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री तब्बल ३३ सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. ही सर्व झाडे ट्रकमध्ये टाकून नेण्यात आले. वन विभागाने घेतलेल्या नोंदीवरून ४.३९३ घनमीटर मालाची चोरी झाली आहे. याची किमत ९० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा खटाटोप वनविभागातीलच काही महाभागांनी चालविला आहे. चोरीस गेलेल्या प्रत्येक थुटाची गोलाई १०० ते १५० सें.मी. असून उंची २५ ते ३० फुटादरम्यान आहे. यावरून एका झाडाची किमत २० हजार रुपयाच्या घरात आहे. अशी ३३ झाडे कापण्यात आल्याने पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी तोडला आहे. हमरस्त्यानजीकच ही कटाई करण्यात आली. झाडे तोडताना कटर मशीन व कुऱ्हाडीचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते. कटाई झालेल्या ठिकाणी दारूच्या रिकाम्या शिशा, जर्दा पुड्या, फरसाण, साळीचा भुसा आढळून आला. उपवनसंरक्षक सुरेश आलुलवार, वनक्षेत्र अधिकारी शिवाजीराव नाईकवाडे यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. (प्रतिनिधी)
बोरगाव जंगलातून सागवान तस्करी
By admin | Updated: September 7, 2014 00:12 IST