यवतमाळ : नगरपरिषद आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. पोषण आहार कामगारांना कुक या पदावर नियुक्ती देऊन दरमहा १५ हजार रुपये वेतन द्यावे, मानधन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत बँक खात्यात जमा व्हावे कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत रुजू करून घ्यावे, शासन निर्णयाविरोधात जाऊन कामगारांना कमी करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, सेंट्रल किचन संदर्भातील परिपत्रक तत्काळ रद्द करून कामगारांचा जगण्याचा हक्क साबूत ठेवावा, शाळा उघडने, बंद करणे आदी प्रकारच्या कामांचा अतिरिक्त मोबदला द्यावा, शाळेमध्ये अन्न शिजविण्यासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, दरवर्षी करारनामा करण्याची पद्धत बंद करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दिवाकर नागपुरे, संगीता बागडे, संतोष मासोळकर, दिलीप सिडाम, गजानन जुनघरे, भीमराव कुंभलवाड, अनसूया घाटरकर, याकतबी शेख रहिम, मेहरबानू शेख नाशिफ, शोभा पावडे, कलावती अंड्रस्कर, गोकुळा मिसाळ, संगीता नेहारे, शेख इब्राहिम शेख इस्माईल, मिराबाई चौरे, तुळसाबाई चोपडे, कविता सिडाम, अर्चना फटींग, पंचफुला कांबळे, दोखळे, नितेश जाधव, सविता जाधव, जयवंती डेहणकर, सुमन गावंडे, माया मानकर, रेखा मडवे आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
शालेय पोषण आहार कामगारांचे धरणे
By admin | Updated: June 14, 2016 01:55 IST