वर्षभरात दुप्पट दर : पाण्याचा मोफत उपसा, विक्री मात्र बेभाव यवतमाळ : रेती, वाळू माफियाच्या धर्तीवर यवतमाळात पाणी माफियाही तयार झाले आहे. या पाणी माफियांची टँकर लॉबी यवतमाळकर नागरिकांची सर्रास लूट करीत आहे. गेल्या वर्षी ३०० रुपये असलेला पाण्याचा दर यावर्षी थेट दुप्पट ६०० रुपये करण्यात आला आहे. सार्वजनिक विहिरींवरून पाण्याचा मोफत उपसा करून त्याची बेभाव विक्री केली जात आहे. यवतमाळकर नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचे वेळापत्रकही तयार केले आहे. यवतमाळच्या हद्दवाढीतील जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रात तर पाणीपुरवठ्याची समस्या आणखीच गंभीर आहे. गुंडभर पाण्यासाठी हापशीवर तासन्तास उभे रहावे लागते. या पाण्यापोटी अनेकांचा दिवसभराचा रोजगारही बुडतो. आई-वडील मोलमजुरीला गेल्याने शाळा बुडवून विद्यार्थी पाण्यासाठी रांगेत उभा असल्याचे चित्र आहे. या भीषण पाणीटंचाईने सामान्य नागरिक होरपळला जात असताना शहरात नव्यानेच उदयास आलेली टँकर लॉबी मात्र जाम खूश आहे. पाणीटंचाई आणखी तीव्र व्हावी आणि आपल्याला पैसे कमविता यावे, असाच या लॉबीचा मनसुबा आहे. त्यामुळेच टंचाईच्या बातम्या येताच ही लॉबी आनंदी होते. या बातम्या आणखी तीव्र स्वरूपात मांडाव्या म्हणून माध्यमांकडे साकडे घालताना दिसत आहे. यवतमाळात नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. मात्र दुसरीकडे सार्वजनिक विहिरींमधून उपसा करून हे पाणी खासगी बांधकामांसाठी पुरविले जात आहे. पाणीटंचाईने टँकर लॉबीत स्पर्धा निर्माण केली आहे. ३०० रुपयाचा टँकर आता ६०० रुपयात दिला जात आहे. नेहरु उद्यान, शिवाजी उद्यान व अन्य विहिरींमधून मोफत पाणी भरुन टँकरद्वारे त्याची विक्री केली जात आहे. भोसा, उमरसरा, वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा या लगतच्या जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रातसुद्धा पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य आहे. (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ नगरपरिषदेचा सावळा गोंधळ, कमांड असलेल्या नगरसेवकांनाच टँकरशहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना यवतमाळ नगर परिषदेचा सावळा गोंधळ सुरू आहे. तेथील पाणीपुरवठा विभाग प्रमुख सुटीवर आहे. लिपिकाच्या भरोश्यावर डोल्हारा उभा आहे. प्रशासन ही टंचाई तेवढ्या गांभीर्याने घेताना दिसत नाही. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा न झाल्याने कृती आराखड्याला मंजुरी नाही. पर्यायाने निधी खर्चालाही मंजुरी नाही. स्थायी समितीने सहा टँकर मंजूर केले होते. सध्या १८ टँकर सुरू असून त्याची कार्योत्तर मंजुरी घेतली जाणार आहे. शहरातील दहा पैकी आठ प्रभागात टँकरने पाणी पुरवठा होतो आहे. त्यातही नगरसेवकाचे राजकीय वजन पाहून त्याच्या नशिबी पाण्याचा टँकर मिळतो. नगर परिषदेची पाणीटंचाईवर विशेष सभाही झाली नाही. यावरुन नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी शहरवासीयांच्या पाण्याच्या समस्येवर किती गंभीर आहे, हे उघड होते. पाणीपुरवठ्याआड सार्वत्रिक निवडणुकीचे राजकारणटँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याआड यवतमाळ नगर परिषदेच्या हद्दवाढीनंतर आगामी चार महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे राजकारण खेळले जात आहे. नगर परिषदेच्या जुन्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना वंचित ठेऊन हद्दवाढ झालेल्या जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टँकर नेले जात आहे. या माध्यमातून तेथील मतदारांना कॅश करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. काही सामाजिक संघटनांचा छुपा अजेंडाही या पाणीपुरवठ्यातून लपलेला नाही. ३० फुटांवर लागले पाणीलोहारा-वाघापूरच्या सीमेवरील एका नागरिकाला अवघ्या ३० फुटावर बोअरला पाणी लागले. त्यानेही शक्कल लढविली. ३० फुटावर पाणी लागले असताना त्याने दीडशे ते दोनशे फूट बोअर खोदले. आता या बोअरमधून तो टँकरला ७० ते १०० रुपये दराने पाणी पुरवठा करतो आहे.
टँकर लॉबीकडून टंचाई कॅश
By admin | Updated: April 23, 2016 02:32 IST