यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. शेतकर्यांना आणखी सोयाबीन बियाण्याची गरज भासणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेता कृषी विभागाकडून पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न केले जात आहे. बियाणे तुटवड्याची जिल्हा पातळीवर सोडवणूक करण्यासाठी कृषी अधिक्षकांनी महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत चांगल्या उगवन शक्तीचे सोयाबीन शेतकर्यांकडे आरक्षीत करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकार्यांना दिल्या. यावर्षी सोयाबीनच्या पेर्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मुळातच बियाणे कंपन्याकडे सोयाबिनचे पुरेसे बियाणे शिल्लक नाही. त्यातुन सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी अधिक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासल्यात उपाय योजनाची माहिती दिली. त्यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार ४० गावामधील किती शेतकर्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे, याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. शिल्लक असलेले सोयाबीन उगवन शक्तीस पात्र आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. असे पात्र बियाणे तुटवड्याच्या काळात शेतकर्यांकडून गाव पातळीवर वापरण्यात येणार आहे. सोयाबीनसोबतच आंतर पीक म्हणून तुरी, मुग, उडीदाची लागवड करण्याचे सूचविण्यात आले. आंतर पीकासोबत चांगल्या उत्पादनाकरीता बिज प्रक्रीया करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.खरीप हंगामात बोगस बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले जाऊ नये म्हणून भरारी पथकाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८८९ गावांमध्ये सोयाबीनचे बियाणे शेतकर्यांकडे शिल्लक आहे. तीन हजार ९२३ शेतकर्यांकडे कृषी विभागाने संपर्क साधला आहे. या ठिकाणावरून २४ हजार ८६३ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. शेतकर्यांच्या घरचे सोयाबीन उगवन शक्तीस पात्र ठरल्या नंतर त्या सोयाबीनवर प्रक्रीया करावी लागणार आहे. त्यासाठी थायरम आणि ट्रायकोडर्माची प्रक्रीया केल्यास बुरशी रोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे. जिल्हयाला लागणारे बियाणे सोयाबीन कंपनीने पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे. मात्र वेळेवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी खरीपाच्या पेरणी पूर्वी बैठक घेण्यात आली आहे. शेतकर्यांना कोणतीच अडचण भासणार नाही. त्यांना दर्जेदार आणि योग्य बियाणे उपलब्ध होईल अशी तयारी करण्यात आली आहे, असे जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. (शहर वार्ताहर)
ंजिल्ह्यात ३० टक्के बियाणांचा तुटवडा
By admin | Updated: May 23, 2014 00:15 IST