नांदेपेरा : ग्रामीण भागात बचत गट लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या बचत गटांच्या माध्यमांतून गावातल्या गावातच आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याने कागदपत्रे जमा करणे, बँकेत चकरा मारण्याा त्रास कमी झाला आहे. शिवाय कुटुंबातील आर्थिक कामे सहजरीतीने होताना दिसत आहे़ गेल्या काही वर्षांपूर्वी बँकांकडून कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकारांच्या दरवाजात जाऊन त्यांचे उंबरठे झिजवावे लागत होते़ त्याचाच फायदा घेत सावकार शेतकऱ्याला अव्वाच्या-सव्वा व्याज आकारून कर्ज देत होते. त्यातच जमानत म्हणून शेतीसुद्धा गहाण करून घेत होते. त्याबाबत लेखी स्वरूपात करारनामा करून घेतला जात होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसुद्धा सावकारांनी गिळंकृत केल्या आहेत. मात्र आता ग्रामीण भागात महिला, पुरूष यांनी एकत्रित येऊन बचत गटांची निर्मिती केल्याने सावकारांना बराच चाप बसला आहे. बचत गटांमुळे बँकेत खाते उघडून व्यवहार गावातच होताना दिसत आहे़ त्यामुळे आर्थिक व्यवहाराचे चित्र बदलत चालले आहे़ बचत गटांना बँकेकडूनही कर्ज मिळत असल्याने अनेक बचत गटांनी गावातच काही लघु व्यवसाय सुरू केले आहे़ त्यामुळे महिलांना या बचत गटांद्वारे गावातच रोजगारही मिळाला आहे़ पुरूषांच्या बचत गटांपेक्षा महिला गटांची सरशी दिसून येत आहे़ बचत गटाची निर्मिती झाली़ या बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. या बचत गटांना पुढे नेण्याकरिता पंचायत समितीमध्ये गटांना प्रशिक्षण देण्याकरिता कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. मात्र नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पुरेशा प्रमाणात सहकार्य मिळात नसल्याचे काही महिला बचत गटांच्या सदस्यांचा आरोप आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बचत गटांना बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. (वार्ताहर)
बचत गटांमुळे शेतकऱ्यांना संजीवनी
By admin | Updated: September 3, 2014 00:05 IST